दिव्य देसम् परंपरेच्या अतिशय उत्कंठावर्धक टप्प्यावर आपण आलो आहोत. आळ्वार, नाथमुनी, यमुनाचार्य यांच्या महान परंपरेनंतर श्रीरामानुजाचार्यांची अधिक समावेशक व सखोल परंपरा सुरु झाली. श्रीरंगम् मंदिराचे महत्त्व व प्रभाव नव्याने समाजमनावर अधोरेखित झाला. प्राचीन भारतातील हे मंदिर अतिशय महत्त्वाचे असे भक्तीचे केंद्रस्थळ बनले. श्रीरंगम् हे सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला आले. त्याविषयी आपण जाणून घेणार आहोतच पण तत्पूर्वी श्रीरामानुजाचार्यांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
यमुनाचार्यांच्या प्रेरणेने श्रीरामानुजाचार्यांनी भक्ती संप्रदायाच्या प्रसाराचे कार्य हाती घेतले. ज्याचा खोलवर ठसा दक्षिण भारतात उमटला. त्यांचे कार्य फक्त तामिळनाडूपुरते मर्यादित राहिले नाही. पूर्ण दक्षिणेतील वैष्णव संप्रदाय श्रीरामानुजाचार्यांचा अंकित झाला. प्राचीनकाळी नदीच्या प्रवाहाने सीमा ठरवली जायची. साहजिकच कृष्णा नदी ही त्याकाळची दक्षिण भारताची सीमा होती. आदि शंकराचार्यांनी जसा भारतभर संचार केला तसा श्रीरामानुजाचार्यांनी केला नाही. जर अधिक लक्षपूर्वक या गोष्टीकडे पाहिले तर लक्षात येईल की, प्राचीन काळच्या इतिहासाचा ठसा अजूनही उमटला आहे. उत्तर दिशा ही नेहेमीच दक्षिणेपेक्षा शिवशंकराची जास्त प्रमाणात उपासक राहिली आहे. तर दक्षिणेत श्रीविष्णूची उपासना जास्त प्रमाणात झाली. उत्तरेत श्रीविष्णूचे अवतार पूजले गेले तर दक्षिणेत श्रीविष्णू, मुख्य रूपात म्हणजेच पेरूमाळ रूपात पूजले गेले. मात्र, हे जरी असले तरी जी दिव्य देसम् मंदिरे उत्तरेत आहेत. त्यावरून हेच सिद्ध होते की, प्राचीन काळी उत्तरदक्षिण असा भेद न करता या भौगोलिक स्थानाला ’एक देश’ या रूपात बघितले गेले. तसेच दक्षिणेतील नायन्मारांच्या शैव किंवा अधिक नेमकेपणे सांगायचे तर, स्मार्त परंपरेने शिवशंभोच्या पूजेअर्चेमुळे, चोळ-पांड्य राजांच्या शैवपंथामुळे दक्षिणेत महादेवाचे महत्त्व अबाधित होते.
मागच्या भागात आपण पाहिले की, श्रीरामानुजाचार्यांचे श्रीरंगम्मधील कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण होते. ज्यामध्ये त्यांनी मंदिराचे धार्मिक व्यवस्थापन, तत्त्वज्ञानाचा प्रचार व भक्तिपंथाचा प्रसार केला. सामाजिक सुधारणेसारख्या बाबी समाविष्ट केल्या. श्रीरामानुजाचार्यांचे कार्य हे श्रीरंगम् मंदिर व रामानुजासंप्रदायासाठी एक मजबूत आध्यत्मिक अशी पायाभूत रचना आहे. श्रीरंगम्च्या रंगनाथाची विशेष कृपा त्यांना प्राप्त होती.
श्रीरामानुजाचार्यांबद्दल एक गोष्ट सांगितली जाते. चोळ नाडूत एक ’थिरूकोष्टियूर नंबी’ नावाचे दिव्य देसम् मंदिर आहे. या मंदिराच्या पेरूमाळला ’नंबी’ नावाने ओळखले जाते. श्रीरामानुजाचार्यांना या नंबीपेरूमाळने ’ॐ नमो नारायणा’ या अतिशय प्रभावशाली व गुप्त मंत्राचा दृष्टांत दिला. त्यावेळेस अत्यंत आनंदित होऊन श्रीरामानुजाचार्यांनी या मंत्राचा प्रसार केला. आजही या मंत्राचे अनन्यसाधारण महत्त्व वैष्णव सांप्रदायात आहे. सर्व मानवांमध्ये परमेश्वर वास करतो त्यामुळे जातीची बंधने तोडून टाकून भक्तिमार्गाने परमेश्वराची सेवा करा, दुसर्यांच्या कल्याणासाठी स्वत:च्या फायद्याचा त्याग करा, संकटाच्या वेळी धर्म व संस्कृतीचे रक्षण करा आणि भगवंताला निष्कलंक श्रद्धा, प्रेम आणि भक्ती समर्पित करा असा संदेश श्रीरामानुजाचार्यांनी स्वतःच्या आचरणातून दिला.

श्रीरामानुजाचार्यांनी यमुनाचार्यांचा तिसरा संकल्प पूर्ण करण्यासाठी ’जियर’ परंपरा सुरू केली. जियर म्हणजे भक्तिसंप्रदायाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी नेमलेली व्यक्ती. थोडक्यात श्रीरामानुजाचार्यांनी पुढे गुरुशिष्याची परंपरा जागती ठेवली. रामानुजाचार्यांचे उत्तराधिकारी असलेले साधू म्हणजेच जियर. हा जियर शब्द संस्कृतमधील ‘जियते’ वरून आला आहे. जियते म्हणजे ’जो विजय प्राप्त करतो तो’. जियर हे आध्यात्मिक प्रमुख असतात, जे विशिष्टाद्वैत वेदांतावर विश्वास ठेवतात. श्रीरामानुजाचार्यांनी 74 आचार्य नेमले व त्यांच्याकडून पूर्ण दक्षिण भारतात वैष्णव संप्रदायाचा प्रसार केला. मात्र त्यांनी जियर परंपरा ही फक्त पाच मठांत, श्रीरंगम्, अहोबिळम, पारकल, वनमामलई व कांचीपुरम मधील वरदराज मठात सुरू केली. आदि शंकराचार्यांनी ज्याप्रमाणे शैव-शंकराचार्य परंपरा निर्माण केली होती तत्त्वतच ही वैष्णव- जियर परंपरा होती. आदि शंकराचार्यांनी ज्याप्रमाणे शृंगेरी, पुरी, द्वारका व ज्योतिर्मठ या चार ठिकाणी पीठे किंवा मठ स्थापन केले तत्त्वतच वैष्णव मठ या पाच ठिकाणी स्थापन झाले. श्रीरामानुजन यांच्यानंतर ’एंबार’ किंवा ’गोविंदाचार्य’ यांनी श्रीरामानुजाचार्यांचे उत्तरदायित्व घेतले. गोविंदाचार्य हे श्रीरामानुजन यांचे चुलत बंधू व अत्यंत प्रिय शिष्य होते. स्वतः श्रीरामानुजाचार्यांच्या हाताखाली गोविंदाचार्य तयार झाले होते. आधीचे जियर त्यांचे उत्तराधिकारी नेमतात. जियर निवड हा एक पवित्र आणि आध्यात्मिक सोहळा असतो. त्यासाठी संभाव्य व्यक्तीला वेद व विशिष्टाद्वैत वेदांताचे गाढ ज्ञान असणे आवश्यक असते. त्यांच्या ठायी नम्रता, संयम, भक्ती, सेवाभाव, समाजसेवेची आवड असणे बंधनकारक असते. मंदिर सेवा व धर्मशास्त्राचे पालन करण्याची योग्यता असावी लागते. जियर यांना ’संन्यास दीक्षा’ घ्यावी लागते. श्रीविळीपुथ्थर, तिरुमला, मेळूकोटे इथल्या मंदिरांतही जियर परंपरेचे पालन होते मात्र प्रमुख मठ हेच पाच आहेत.
श्रीरंगम्, अहोबिळम, पारकल, वनमामलाई व कांची वरदराज या पाचही मठांमार्फत आजही पाचही जियर भक्ती, शास्त्राध्यन, मंदिरसेवा व समाजकारणात सक्रिय आहेत. या सगळ्या परंपरा अजूनही जिवंत आहेत. प्रत्येक मठाविषयी अजून जास्त माहिती आपण पाहूया.
श्रीरंगम् जियर- वैष्णव जगतातील अतिशय महत्वाचे नामानिधान. श्रीरामानुजाचार्यांच्या कार्याचे मुख्य केंद्र हे श्रीरंगम् आहे. इथल्या जियरला ’श्रीरंग नायक’ म्हणतात. जियर मठांतील श्रीरंगम् मठ हा अतिशय प्राचीन व प्रतिष्ठित आहे. इतर मठांचे नियमन व व्यवस्थापन सुद्धा श्रीरंगम्कडून होते. इथल्या जियरचे नाव ’श्रीमद अंदवन श्रीवराह महा देशिकम स्वामी’ असे आहे. श्रीरामानुजाचार्यांची परंपरा पुढीलप्रमाणे होती. श्रीरामानुजाचार्य - एंबार गोविंदाचार्य - पराशर भट्टार - नाडादूर अळवंदर...
अहोबिळम मठ- आंध्र प्रदेशात नंदयाळच्या घनदाट अरण्यात अहोबिळम मंदिर व मठ आहे. इथले दिव्य देसम् मंदिर म्हणजे नृसिंहाचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. इथे नृसिंहाची वेगवेगळ्या रूपांतील नऊ मंदिरे आहेत. त्याला ’लोवर अहोबिळम’ किंवा ’अप्पर अहोबिळम’ म्हणतात. चार मंदिरे खालच्या भागात व पाच मंदिरे वरच्या भागात आहेत. हिरण्यकश्यपूला जिथे नृसिंहाने मारले तो भाग सगळ्यांत उंच, वरच्या भागात आहे की जिथे ’उग्रनृसिंहाचे’ मंदिर आहे. इथली नऊ मंदिरे मिळून एक दिव्य देसम् होते. अहोबिळमचे पहिले जियर ’आदिवन शठकोप’ होते. हा मठ इ. सनाच्या 1398 साली स्थापन झाला. आताचे जियर हे 46 वे असून त्यांची नाव ’श्री श्री रंगनाथ यतींद्र महादेशिकम स्वामी’ आहे. ते 2013 पासून कार्यरत आहेत. हा मठ विशिष्टाद्वैताचा प्रचारक आहे. अहोबिळमच्या बर्याच ठिकाणी शाखा स्थापन झाल्यात.
वनमामलई मठ- सुदूर दक्षिणेत तिरूनेलवेलीजवळ असलेला हा मठ अतिशय महत्त्वाचा आहे. वनमामलई मंदिर हे श्रीविष्णूच्या आठ स्वयंभू स्थळांतील एक आहे. वनमामलई मंदिर व जियर परंपरा अनुभवण्याचे भाग्य मला मंदिराच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी लाभले आहे. वनमामलईच्या जियरचे नाव ’तोटाद्री नाथर पेरूमाळ’ आहे. हा मठ सेवा, अन्नदान व वेदशिक्षण यासाठी प्रसिद्ध आहे. आताचे जियर 31 वे असून त्यांचे नाव ’श्रीमद परमहंस मधुरकवी रामानुज जियर स्वामी’ आहे. त्यांची नेमणूक 2024 साली झाली आहे.
परकल मठ- कर्नाटकातील म्हैसुरू मठाला परकल मठ म्हणतात. इथे श्रीलक्ष्मीनृसिंह मंदिर आहे. विद्वत्ता व ज्ञानप्रसारासाठी हा मठ प्रसिद्ध आहे. परकल मठ म्हैसुरू राजघराण्याशी संबंधित आहे. इथले 36 वे जियर 1992 पासून कार्यरत आहेत. त्यांचे नाव ’श्रीमद अभिनव वागीश ब्रह्मतंत्र परकाल महादेशिकर स्वामी’ आहे.
कांची वरदराज मठ- श्रीरामानुजाचार्य हे कांचीपुरमच्या वरदराज मंदिराचे पुजारी होते. त्यांच्या आयुष्यात वरदराजाचे अतोनात महत्त्व होते. कांचीचा मठ, वैष्णव तत्त्वज्ञानाच्या प्रचारासाठी प्रसिद्ध आहे. कांचीच्या जियरचे नाव ’वाधी केसरी आज्ञेय मनवाळ’ आहे.
सर्वच जियर विशिष्टाद्वैत वेदांताचे गाढे अभ्यासक असतात. याशिवाय समता, भक्ती आणि सेवेसाठी कटिबद्ध आहेत. ते नुसते धर्मकार्य अथवा देवपूजेत रममाण नाहीत तर समाजासाठी शिक्षण, अन्नदान, मदतकार्य यांमध्येही पुढाकार घेतात.
श्रीरामानुजाचार्यांनंतर मंदिर व मठांमध्ये तेनकलई व वेदीकलई असे दोन भाग पडले. कांची वरदराज, परकल, अहोबिळम हे वेदीकलई पूजापद्धतीचे भाग होते तर श्रीरंगम्, वनमामलई येथे तेनकलई पूजापद्धत सुरू झाली. मात्र श्रीरंगम् येथे वेदकलईचा सुद्धा कमी प्रमाणात का होईना पण वापर होतो.
श्रीरामानुजाचार्यांना श्रीरंगम्ची, रंगनाथाची मनस्वी ओढ होती. त्यांच्यावर रंगनाथस्वामीची विशेष कृपाही होती. श्रीरामानुजांना भगवान रंगनाथाच्या चरणांमध्ये विलीन व्हायचे होते. तशीच दिव्य गती त्यांना प्राप्त झाली. 5 जानेवारी 1137 मध्ये श्रीरामानुजार्यांचे देहावसान झाले. श्रीरंगम्च्या इतिहासातील सर्वात मोठा व महत्त्वाचा अध्याय समाप्त झाला. श्रीरामानुजाचार्यांचे आध्यात्मिक कार्य, भक्तिपंथ, विशिष्टाद्वैत वेदांत तत्त्वज्ञान विस्मृतीत जाऊ नये यासाठी त्यांच्या पार्थिवाची अत्यंत श्रद्धापूर्वक पूजा करून, अग्नी न देता श्रीरंगनाथस्वामी मंदिरात जपून ठेवले. पार्थिव जपून ठेवण्यासाठी त्यांत विविध औषधी, गंध, तेल यांचा वापर केला जातो. आज त्या मंदिराला ’श्रीरामानुजन संनिधी मंडप’ म्हणतात. बाजूला वरदराजाचे लहान मंदिर आहे. नऊशे वर्षांपूर्वीचे ते अत्यंत पवित्र पार्थिव बघताना आपला हृदयाचा ठोका चुकतो आणि आपण अत्यंत भक्तिभावाने नतमस्तक होतो. काळाच्या एका वेगळ्याच मितीत गेल्यासारखे वाटते... अतिशय भावात्मक अनुभव आहे हा!!