भक्त कार्य जाणे भगवंतमाया

विवेक मराठी    07-May-2025   
Total Views |
Karunastake
भगवंत कष्टातून काही धडे देत असतात. भगवंत दयाळू आहे. त्याची माया भक्ताला सहज समजत नाही. यासाठी भक्ताने संकटे आली तरी देवाला विसरू नये. आपली निष्ठा कायम ठेवावी. हे स्वामींना सांगायचे आहे.
भक्त रामाच्या भेटीसाठी तळमळत आहे. त्याला वाटते की माझा जनक, सौंदर्याचा खजिना असलेला राम या भक्ताची कठोर परीक्षा का घेत आहे. दयाळू परमेश्वराची माझ्याविषयी माया आटली की काय? या शंकेचे उत्तर शोधण्यासाठी स्वामींनी पुढील श्लोक सांगितला -
 
जननिजनकमाया लेंकरूं काय जाणें ।
पय न लगत मुखीं हाणिता वत्स नेणे ।
जळधरकण आशा लागली चातकासी ।
हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ॥ 9 ॥
 
(आईवडील किती प्रेम करतात याची तान्ह्या बाळाला कल्पना नसते. भुकेने वासरू गाईच्या आचळाला लागते, पण गाय त्याला (लाथेने) मारते, (दूर ढकलते) का ते वासराला कळत नाही. (भगवंतभेटीची आतुरता अशी असावी की) चातक पक्षाला पावसाच्या थेंबाची आशा असते. भूमीवर राहणारा (चकोर) पक्षी (चांदणे पिण्यासाठी) चंद्राचे अवलोकन करतो).
 
 
नमस्कार सुहृदहो !
 
भगवंताचा साक्षात्कार व्हावा यासाठी साधक अनेक कष्ट सोसून परमेश्वराची भक्ती करतो. सर्वांना माहीत आहे की, स्वामींनी रामासाठी वयाच्या बाराव्या वर्षी घर सोडले. जांबेहून ते नाशिकला आहे. तपसाधनेसाठी स्वामींनी किती हालअपेष्टा सोसल्या ते आठवा. टाकळीजवळील एका गुहेत एकट्याने वास्तव्य, पहाटे उठून संगमावर स्नान, आन्हिके व व्यायाम आटोपून रामनामाचा जप, गोदावरीच्या पाण्यात उभे राहून गायत्री पुरश्चरण. दुपारी भिक्षा मागून रामाला नैवेद्य. नंतर अन्नग्रहण, प्रसाद म्हणून. या सार्‍या हालअपेष्टा स्वामींनी थोड्याथोडक्या नव्हे तर बारा वर्षे सोसल्या. अशावेळी कुठेतरी त्यांच्याही अंतर्मनात शंका आली असणार की, माझ्याविषयी राम इतका कठोर कसा झाला. त्याला माझी दया येत नाही का, मला तो दर्शन का देत नाही. तथापि अशा विचारांनी निराश न होता शांत मनाने रामावरची निष्ठा न ढळू देता, स्वामींनी या शंकेचे उत्तर वरील श्लोकात शोधले आहे.
 
 
स्वामी त्या श्लोकात म्हणतात की, आईवडील किती माया करतात याची लेकराला कल्पना नसते. आई तान्ह्या बाळाला आपल्या नजरेसमोर एकटा ठेवून घरातील कामे करीत असते. बाळ रडले तरी आई त्याला काही वेळ रडू देते. कारण तिला ठाऊक असते की रडल्याने वा हातपाय हलवण्याने त्याला व्यायाम मिळतो. अशा व्यायामाची त्याला आवश्यकता असते. अगदी व्याकूळ झाल्यावर आई बाळाला जवळ घेते. याचा अर्थ तिची तिच्या बाळावर माया नसते असा नाही.
 
प्रस्तुत श्लोकात स्वामींनी गायवासराचे उदाहरण घेतले आहे. भुकेले वासरू दूध पिण्यासाठी गाईच्या आचळाला लागल्यावर गाय लाथ मारून वासराला दूर करते. भुकेने वासरू पुन्हा गाईकडे धावते व तिच्या आचळाशी झटे देऊ लागते. गाईच्या सडाला ढुशा देऊ लागते. त्यामुळे गाईला पान्हा फुटून वासराला पोटभर दूध पिता येते. सुरुवातीला माया असूनही गाय वासराला लाथ मारून दूर का करते हे त्या वासराला समजत नाही.
 
 
निसर्गात प्राण्यांना ही अशी उपजत बुद्धी असते. बरेच वर्षापूर्वी टी.व्ही. वर National Geographic wild  या नावाचे एक चॅनल होते. आता आहे की नाही माहीत नाही. पण त्यात अरण्यातील वन्य प्राण्यांचे चित्रण केलेले असायचे. त्यात चित्रित केलेल्या एका दृश्यात अरण्यात प्रसूत झालेल्या हरिणीला दाखवले होते. ती हरिणी पिल्लाला जन्म दिल्यावर पाच-सहा फूट अंतरावर जाऊन उभी राहते. पाय लटपटत कसेतरी उभे राहण्याचा प्रयत्न करणारे ते नवजात पिल्लू धडपडत हरिणीजवळ पोहोचते व तिच्या आचळाला लागते. हरिणी मायेने त्याला चाटते व आपल्या पायात सुरक्षित ठेवते. अरण्यातील हरणांचे जीवन सर्वस्वी पायाच्या मजबुतीवर निर्भर असते. अरण्यात वावरताना उंच आणि लांब उड्या मारत हरणाला आपला बचाव करावा लागतो. त्यासाठी पाय मजबूत हवेत. हे शिक्षण हरिणी पिल्लाला जन्माच्या क्षणापासून देते. हे वरील प्रसंगावरून दिसते. येथे हरिणीची आपल्या पिल्लावर माया नसते असे थोडेच आहे, पिल्लाच्या भविष्यासाठी तिला कठोर व्हावे लागते. त्याप्रमाणे उपासना करीत असताना भक्तावर संकटे येतात, त्या संकटांकडे याच दृष्टीने पाहिले पाहिजे. भगवंत कष्टातून काही धडे देत असतो. भगवंत दयाळू आहे. त्याची माया भक्ताला सहज समजत नाही. यासाठी भक्ताने संकटे आली तरी देवाला विसरू नये. आपली निष्ठा कायम ठेवावी. हे स्वामींना सांगायचे आहे. भगवंताचा हेतू सामान्यांना कळत नाही. यासाठी ’गुरुचरित्र ’ग्रंथातील 18 व्या अध्यायातील एक कथा उद्बोधक आहे.
 
 
अमरापूर गावात एक वेदाभ्यासक, सुशील पण दरिद्री ब्राह्मण सात्विक वृत्तीने राहात असे. त्याच्या घराच्या अंगणात घेवड्याचा वेल उंच वाढला होता. तो ब्राह्मण कोरडी भिक्षा आणत असे. त्याची पत्नी त्यावर स्वयंपाक करून अंगणातील शेंगांची भाजी करून त्याचा श्रीगुरुंना नैवेद्य दाखवीत असे. ते अत्यंत गरिबीत राहात. रोजच्या जेवणासाठी त्यांना घेवड्याच्या वेलाचा आधार होता. एक दिवस श्रीगुरू भिक्षेसाठी त्या गरीब ब्राह्मणाच्या घरी आले. दोघांनीही श्रीगुरुंचे स्वागत केले. आनंदाने त्यांनी श्रीगुरुंच्या झोळीत भिक्षा टाकली. प्रसन्नमुद्रेने श्रीगुरू त्या ब्राह्मणाला म्हणाले, “आजपासून तुझे दारिद्य्रदोष समाप्त झाले”. पण जाताना श्रीगुरुंनी त्या शेंगाचा वेल मुळासकट छाटून टाकला. ते पाहून ब्राह्मणपत्नीला वाईट वाटले. तो वेल तिचा आधार होता. ती म्हणाली, “आम्ही या यतीश्वराला काय त्रास दिला होता की त्याने या दरिद्री घराची भाजीची सोय नष्ट केली. तो वेलच छाटून टाकला.” पतीने तिला समजावले. ‘हे आपले प्रारब्ध आहे. तेव्हा त्या यतीश्वरांना का दोष द्यायचा? आता या वेलाचे मूळ छाटले गेल्यामुळे त्याचा आपल्याला उपयोग नाही.’ असे म्हणून तो ब्राह्मण वेल काढून फेकण्यासाठी वेलाच्या मुळाशी माती उकरू लागला. तो अचानक तेथे त्याला धनाचा हंडा सापडला. त्याचे दारिद्य्र संपले. त्याला आठवले, यतीश्वर निघताना म्हणाले होते की ‘आजपासून तुझे दारिद्य्रदोष संपले.’
 
 
यासाठी भक्ताने भगवंतावरील आपली श्रद्धा कायम ठेवावी. कितीही संकटे आली तरी निराश होऊ नये किंवा देवाला दोष देऊ नये. रामभेटीची तळमळ कायम ठेवावी. तळमळीने, निष्ठेने भगवंत भेटतो यावर विश्वास ठेवावा. तळमळ व चिकाटी कशी असावी हे सांगण्यासाठी समर्थ या ठिकाणी चातक व चकोर या पक्षांचे उदाहरण देतात. पृथ्वीतलावर गोड्या पाण्याचा कितीही साठा उपलब्ध असला तरी चातक पक्षी फक्त पावसाचा थेंब चोचीत घेऊन पितो अशी कल्पना आहे. तहानेने आसुसला तरी तो इतर पाणी पीत नाही. चोच वर करून आतुरतेने तो पावसाच्या थेंबाची वाट पाहातो. तसे भक्ताने आतुरतेने रामाच्या भेटीची वाट पाहावी. त्याचप्रमाणे स्वामींनी चकोर पक्षाचे आणखी एक उदाहरण दिले आहे. हा चकोर पक्षी अत्यंत नाजूक असून तो फक्त चंद्राचे चांदणे पिऊन जगतो अशी कल्पना आहे. जमिनीवर राहणारा हा पक्षी पौर्णिमेच्या चंद्राच्या पिठूर चांदण्याची किती आतुरतेने वाट पाहात असेल कल्पना करा. कारण ते त्याचे जीवन असते. साधकाने या पक्षांची आतुरता अभ्यासावी व भगवंताविषयी तशी तळमळ ठेवावी. चातक आणि चकोर या पक्षांची भेट संतवाङ्मय वाचत असताना होते. या जरी कविकल्पना असल्या तरी त्यांच्याकडून आतुरता, तळमळ व निश्चय हे गुण शिकता येतात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज ही तळमळ समजावी म्हणून चकोर पक्षाचे उदाहरण आपल्या साहित्यातून देतात. प्रस्तुत श्लोकात समर्थ चातकाचा नावानिशी उल्लेख करतात. पण चंद्रासाठी ’हिमकर’ ’शब्दाचा प्रयोग करून चकोर पक्षी सूचित करतात. येथे रामभक्तीसाठी तशी तळमळ हवी हा भाव महत्त्वाचा आहे.

सुरेश जाखडी

'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..