पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच बिहारमधील मधुबनी येथे झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी यांनी समस्त भारतीयांना असे आश्वस्त केलेे होते. त्यांच्या बोलण्यातून देशाचे प्रमुख म्हणून घडलेल्या घटनेविषयी मनात असलेला संताप, झालेले अपरिमित दु:ख जसे व्यक्त झाले तसे त्यांनी केलेला दृढनिर्धारही समस्त भारतीयांना दिसला.
पहलगाम इथे 22 एप्रिल रोजी झालेल्या अमानुष हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आहे. त्याची सुरुवात पाकव्याप्त जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले करून झाली. अतिशय महत्त्वाचे समजले जाणारे हे नऊ तळ भारतीय हवाई दलाने उध्वस्त केले असून यात सुमारे 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. यापुढेही काही काळ हे ऑपरेशन चालू राहील असे केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी सांगितले. सर्वपक्षीय खासदारांना या मोहीमेविषयी निवेदन देण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यानंतर रिजिजू पत्रकारांशी बोलत होते. ‘कोणत्याही मतभेदांपेक्षा देशाची एकता, अखंडता सर्वोपरि आहे’, असे म्हणत या मोहीमेत आपण सरकार व सैन्याच्या पाठिशी आहोत असे सर्वपक्षीय खासदारांनी आश्वासन दिले.
“मैं बहोत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूँ जिन्होंने यह हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचनेवालों को उनकी कल्पना से भी बडी सजा मिलेगी...अब आतंकियों की बचीकुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है...एक सौ चलीस करोड भारतीयों की इच्छाशक्ती अब आतंक के आकाओं की कमर तोडकर रहेगी...‘’ पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच बिहारमधील मधुबनी येथे झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी यांनी समस्त भारतीयांना असे आश्वस्त केलेे होते. त्यांच्या बोलण्यातून देशाचे प्रमुख म्हणून घडलेल्या घटनेविषयी मनात असलेला संताप, झालेले अपरिमित दु:ख जसे व्यक्त झाले तसे त्यांनी केलेला दृढनिर्धारही समस्त भारतीयांना दिसला. देशाचे नेतृत्व कणखर असले की सैन्यदलेही निहित कामगिरी चोख पार पाडतात, याची उरी व पुलवामा घटनांना दिलेल्या प्रत्युत्तरामुळे भारतीयांना खात्री होती. म्हणूनच आत्ताही भारतीय सैन्यदलाच्या सामर्थ्यावर जनतेचा विश्वास होता आणि त्यांच्यामागे ठामपणे उभ्या असलेल्या राजकीय नेतृत्वावरही.
पहलगाम इथे हिंदू पर्यटकांवर झालेला अमानुष हल्ला भारताच्या आत्म्यावर, इथल्या चिरंतन संस्कृतीवर आणि देशाच्या सार्वभौमत्वावर केलेला हल्ला होता. त्याने संपूर्ण राष्ट्र शोकाकुल झाले. हिंदू पुरुषांची त्यातही कुटुंबप्रमुखांची त्यांच्या नातेवाईकांसमोर हत्या करताना इस्लामी दहशतवाद्यांनी काढलेले, ‘जा, जाके मोदी को बोल दे...’ हे दर्पोक्तिपूर्ण उद्गार भारतीयांच्या मनावर खोलवर आघात करून गेले आणि त्याच उद्गारांनी प्रत्येकाच्या मनात प्रतिशोधाचा वडवानल पेटवला.
आता ‘ऑपरेशन सिंदूर’ या प्रतीकात्मक नावाने भारतीय सैन्याने हा प्रतिशोध सुरू केला आहे. या ऑपरेशनसाठी योजलेले नाव अनेकार्थांनी प्रतीकात्मक असल्याने ते भारतीयांच्या मनाला खोलवर स्पर्शून गेले. सिंदूर हे केवळ हिंदू स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतीक नाही तर ते शौर्याचे आणि विजयाचेही प्रतीक आहे. प्राचीन काळापासून भारतीय योद्धे रणांगणावर जाण्याआधी कपाळी लाल टिळा लावत असत. हा टिळा त्यांच्या पराक्रमाचे आणि ध्येयनिष्ठेचे प्रतीक असे. म्हणूनच ‘ऑपरेशन सिंदूर’चे नाते या योद्ध्यांच्या परंपरेशी, पराक्रमाशीही आहे.
जो निर्धार पंतप्रधानांनी मधुबनी येथील सभेत व्यक्त केला होता, त्याला भारतीय सैन्य प्रत्यक्ष वास्तवात आणत आहे.पाकव्याप्त जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या 9 तळांवर 24 क्षेपणास्त्रे डागत, अचूक लक्ष्य साधत हे हल्ले करण्यात आले. पाक हवाई सीमा पार न करता अत्याधुनिक क्षेपणास्त्रांच्या मदतीने साधण्यात मिळालेले यश हे या मोहीमेचे वैशिष्ट्य. हे लक्ष्य अचूकपणे साधताना पाकिस्तानी नागरिकांच्या जीवाला धक्का लागू दिला नाही की पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ला केला नाही. यातून आपली लढाई दहशतवादाशी आणि त्याला पाठिशी घालणार्या वृत्तीशीच आहे, हा संदेश भारतीय सैन्य आणि सरकारने जगाला दिला आहे.
या ऑपरेशनचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पाडल्यानंतर त्याविषयीची माहिती प्रसारमाध्यमांना देण्याची जबाबदारी कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्यावर सोपविण्यात आली. एक मुस्लीमधर्मीय व एक हिंदूधर्मीय महिला लष्करी अधिकारी अशी निवड करताना, या देशात धर्माच्या आधारावर दुफळी माजविण्याचा कोणीही प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही हा थेट संदेश दिला गेला. महिलांची क्षमता, सामर्थ्याचा भारतात सन्मान होतो हे ही त्यातून अधोरेखित करण्यात आले. एअर स्ट्राईकबरोबर या नरेटिव्ह स्ट्राईकमधूनही भारताने खूप काही साध्य केले आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढचे काही दिवस ही मोहीम चालूच राहणार आहे. हे संपादकीय लिहित असताना पाकिस्तानच्या रावळपिंडी, कराची, लाहोर येथे बाँबब्लास्ट झाल्याचे वृत्त आहे. हे योजनाबद्ध, पूर्ण विचार करून आखलेले ऑपरेशन तडीस नेण्यासाठी सैन्य आणि सरकार समर्थ आहे. सर्वपक्षीयांचा त्यांना शत प्रतिशत पाठिंबा आहे. सर्वसामान्य नागरिक म्हणून या काळात आपल्याकडून जे सहकार्य अपेक्षित आहे ते आपणही द्यायला हवे. ज्या प्रकारचे वर्तन आणि सज्जता आपल्याकडून अपेक्षित आहे तसे ते असायला हवे. नागरी संरक्षण सज्जतेसाठी देशाच्या विविध भागांत मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. आपण सीमेवर लढणारे सैनिक नसलो तरी शत्रूहल्ला झाल्यास त्याला समर्थपणे, नीडरपणे तोंड देणारे नागरिक आहोत हे कृतीतून दाखवून देण्याची ही वेळ आहे. ती आपली जबाबदारीही आहे व कर्तव्यही.
दहशतवादाच्या विषवल्लीने सगळ्या जगाला विळखा घातला आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर हा विषय सातत्याने मांडत आले आहेत. त्याचे गांभीर्य आणि त्याचा एकत्रितपणे सामना करण्याची गरजही पुन्हापुन्हा अधोरेखित करत आले आहेत. पहलगामचा हल्ला फक्त भारतासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा आहे.
ऑपरेशन सिंदूरमधून दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भारत सर्वसामर्थ्यानिशी निर्धाराने उभा ठाकला आहे. सामर्थ्यशीलता, नीडरता आणि न्यायबुद्धीचे दर्शन यातून जगाला घडते आहे. विश्वगुरू होण्यासाठी ही गुणवैशिष्ट्येही तितकीच गरजेची आहेत.