अवघा हलकल्लोळ करावा...‘ऑपरेशन सिंदूर’ – भारतीय स्वत्वाचा नवा अविष्कार!

विवेक मराठी    09-May-2025   
Total Views |
आजवर पाकिस्तानने जगभरातून भीक मागून केवळ भारताविरोधात दहशतवादी तयार करण्याचं काम केलं आणि सातत्याने भारतावर भ्याड, विकृत दहशतवादी हल्ले केले. पहलगाम हल्ल्याने या विकृतीचं टोक गाठलं. आता शिशुपालाच्या शंभर अपराधांचा घडा भरला आहे. एका जबाबदार, परिपक्व, वेगाने विकसित होत असलेल्या लोकशाही राष्ट्राच्या संयमाचा अंत इस्लामी दहशतवादाच्या या विचारसरणीने पाहिला. परिणामी हा हलकल्लोळ पाकिस्तानच्या नशिबी आला आहे. तो पुढे किती काळ आणि कसा चालेल हे सांगता येणं अशक्य असलं तरी भारताच्या किंबहुना दक्षिण आशियाच्या राजकीय इतिहासातील हा टप्पा ’माईलस्टोन’ ठरतो आहे, हे मात्र निश्चित.

Operation Sindoor  
 
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा तातडीने सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यातून स्थगित करून भारतात परतले, तेव्हा नवी दिल्लीत त्यांची विमानातून उतरत असतानाची दृश्ये आपल्यातील अनेकांनी पाहिली असतील. नेहमीप्रमाणे राजशिष्टाचारानुसार प्रशासकीय अधिकारी विमानतळावर मोदींच्या स्वागतासाठी उपस्थित होते. मोदींनी उतरल्यावर त्या सर्वांना नमस्कार केला आणि ते पुढे निघाले. यावेळी आपण आपल्या पंतप्रधानांचे स्वागत एका अतिशय कठीण, आणीबाणीच्या परिस्थितीत करतो आहोत, याचं भान त्या सर्वच अधिकार्‍यांना होतं. पहलगाममध्ये जे घडलं होतं त्याचा संताप, चीड सर्वांच्याच देहबोलीतून जाणवत होती. प्रसारमाध्यमांचे कॅमेरेही त्यावेळी मोदींकडे रोखलेले होते. आपल्या तब्बल 26 निष्पाप, निःशस्त्र नागरिकांच्या त्यांचा धर्म विचारून, त्यांच्या बायकामुलांसमोर केलेल्या विकृत हत्यांच्या रक्ताचे डागही अद्याप वाळलेले नव्हते. दीडशे कोटींचा देश खवळलेला होता, प्रतिशोधाच्या भावनेने पेटलेला होता. सौदीमध्ये असताना या हल्ल्याचं वृत्त समजल्यानंतर, परतीच्या प्रवासादरम्यान पंतप्रधानांच्या मनात काय विचार आले असतील, याचा थांग लावणं अवघड आहे. कदाचित एक भारतीय म्हणून त्यांच्याही मनात टोकाच्या प्रतिशोधाचे विचार आले असतीलही. परंतु देशाचा नेता म्हणून संयत, विचारपूर्वक, ’कॅल्क्युलेटेड’ पाऊल उचलणंही त्यांच्यासाठी तितकंच आवश्यक होतं. मोदी जेव्हा विमानातून उतरल्यानंतर सर्वांना भेटून पुढे मार्गस्थ झाले तेव्हा त्यांचा चेहरा, देहबोली ही जराही आक्रस्ताळी नव्हती, त्यात कठोरताही होती आणि वादळापूर्वीची शांतताही होती. भारताचं प्रत्युत्तर हे कुणाच्याही कल्पनेबाहेरचं आणि ’अनकन्व्हेन्शनल’ असणार, हे तेव्हाच स्पष्ट झालं होतं. 7 मेचा दिवस उजाडला आणि भारताने केवळ पाकव्याप्त काश्मीरच नव्हे तर थेट पाकिस्तानात एकूण 9 ठिकाणी घडवलेले एअर स्ट्राईक्स जगाने पाहिले आणि ’त्या’ दिवशी मोदींचा चेहरा इतका शांत आणि निश्चल का होता, याचं उत्तर सर्वांना मिळालं.
 
 
एखाद्या राष्ट्र-समूहावर असा कोणताही आणीबाणीचा, संकटाचा प्रसंग आल्यानंतर त्यावर जो काही प्रतिसाद दिला जातो, त्या प्रतिसादापूर्वीची प्रक्रिया ही कायमच दुहेरी स्तरांवर सुरू असते. एक प्रक्रिया यंत्रणेची असते ज्यात त्या देशाचे मुत्सद्दी, शासन-प्रशासनातील वरिष्ठ, सेनादलांचे प्रमुख, संरक्षणविषयक सल्लागार आदी मंडळी काम करत असतात. दुसरी प्रक्रिया या सर्वांच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या मनात सुरू असते. कारण त्या खुर्चीवर बसलेल्या माणसालाच नंतर त्या यशापयशाचं उत्तरदायित्व स्वीकारायचं असतं. दोन राष्ट्रे, समाज, संस्कृतींमधील संघर्षात एक चुकीचं पाऊल पुढील कित्येक दशकांचा परिणाम घडवतं. 1948 साली काश्मीर प्रश्नात संयुक्त राष्ट्रांच्या दारात जाऊन उभं राहण्याच्या एका निर्णयाचे परिणाम आज 75 वर्षांनंतरही भारत भोगतो आहे. देशाच्या फाळणीदरम्यान, सीमावादांमध्ये, युद्धांनंतरच्या वाटाघाटींमध्ये केलेल्या अशा अनेक चुकांची यादीच आपल्याला काढता येईल की ज्यांचे दुष्परिणाम भारताने पुढे कित्येक दशके भोगले आहेत. अजाणतेपणी, अज्ञानातून वा हेतुपुरस्सर अशा कोणत्याही कारणांमुळे घेतलेला एक छोटासा चुकीचा निर्णय पुढील कित्येक पिढ्यांचं भविष्य धोक्यात आणू शकतो आणि म्हणूनच त्या त्या वेळी त्या राष्ट्र-समूहाचं प्रमुख नेतृत्व काय विचार करून काय निर्णय घेतं यावर बहुतांश गोष्टी अवलंबून असतात. नेतृत्वाचं ’कन्व्हिक्शन’ आणि निर्धार अविचल असेल तर त्याने घेतलेला निर्णय राबवणार्‍या यंत्रणा मोकळेपणे आणि प्रभावीपणे काम करू शकतात. नेताच जर जबाबदारीपासून पळ काढणारा किंवा मनातून गोंधळलेला, कणाहीन असेल तर कितीही कार्यक्षम, अद्ययावत, आधुनिक यंत्रणा त्याच्या जोडीला असली तरी निर्णयाला यश लाभत नाही. अनेकदा काही निर्णयच न होता स्थितिवादी बनून राहणं यंत्रणा अधिक पसंत करते. भारतासारख्या लोकशाही देशालाही हेच लागू पडतं. यासाठी फार मागे जायची गरज नाही, 2014 पूर्वीच्या आणि 2014 नंतरच्या पाकिस्तानविषयक धोरणाचा धावता आढावा जरी घेतला तरी हे सहज लक्षात येतं. 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळालेलं नसताना, आघाडीचं सरकार सत्तेत असतानाही ज्या सहजपणे, आत्मविश्वासाने केंद्र सरकार मागचे पंधरा दिवस वागलं, आज जो काही जबरदस्त हलकल्लोळ भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानात घडवला, ते पाहता नेतृत्वाचं कन्व्हिक्शन किती महत्त्वाचं ठरतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
 
 
भारताचं यावेळेचं प्रत्युत्तर अनेकार्थांनी जगाला चकित करणारं आहे. कारण यावेळी थेट बहावलपूरसारख्या भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेतून शंभर किमीहून अधिक अंतर असलेल्या ठिकाणी किंवा मुरीदकेसारख्या लाहोरच्या अगदी जवळ असलेल्या किंवा मेहमून जोयासारख्या सियालकोटजवळ असलेल्या ठिकाणी मोठा हल्ला करणं आणि अशा सर्व मिळून तब्बल 9 ठिकाणी एअर स्ट्राईक्स करणं, या सर्व गोष्टींची आजवर कधी कुणी कल्पनाही केली नसेल. यातही या ऑपरेशनला दिलेलं ’ऑपरेशन सिंदूर’ हे नाव दीडशे कोटी भारतीयांचं मन जिंकणारं ठरलं आहे. नुकतंच लग्न झालेले भारताचे तरुण नौदल अधिकारी ले. विनय नरवाल यांची पहलगाम हल्ल्यात त्यांच्या पत्नीच्या डोळ्यांदेखत हत्या झाली होती. त्यांच्या मृतदेहाशेजारी बसलेल्या त्यांच्या पत्नी हिमांशी यांचा फोटो पाहून सारं जग हादरलं होतं. अशाच अनेकजणांना त्यांचा धर्म विचारून, ते मुस्लीम नसून हिंदू आहेत याची खात्री करून त्यांच्या कुटुंबियांदेखत गोळ्या घातल्या गेल्या. या कृतीतून इस्लामी दहशतवादी विचारसरणीचा क्रूर आणि थेट संदेश इस्लामेतरांना देण्यात आला होता. या संदेशाला भारताने गेल्या अनेक वर्षांत दिलं नव्हतं इतकं जबरदस्त प्रत्युत्तर या एअर स्ट्राईक्समधून दिलं गेलं आणि म्हणूनच ’ऑपरेशन सिंदूर’हे नाव सार्थ ठरलं. सर्व ठिकाणी अचूक लक्ष्यभेद करून दहशतवादी तळ अवघ्या अर्ध्या तासाच्या ऑपरेशनमध्ये उध्वस्त केले गेले. त्यांचे व्हिडिओ फुटेजेसदेखील पूर्ण तपशीलवार आज झालेल्या पत्रकार परिषदेत भारताने मांडले आणि ही जबाबदारी उचलली कर्नल सोफीया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह या दोन कर्तृत्ववान महिला सैन्य अधिकार्‍यांनी! या भारताच्या कृतीमुळे ’ऑपरेशन सिंदूर’ हे नाव यथार्थ ठरलंच शिवाय भारताची लढाई ही कोणत्या विचारसरणीशी आहे आणि भारत कोणत्या विचारसरणीचं प्रतिनिधित्व करतो, याचा योग्य संदेश जगापर्यंत पोहोचला. ही बाब सर्व भारतीयांना भावनिकदृष्ट्या आनंददायी आहे तितकीच ती मुत्सद्देगिरीच्या बाबतीत कमालीची उत्कृष्ट, विचारपूर्वक केलेली कृतीदेखील ठरली आहे. पहलगाम हल्ल्यापूर्वी पाकिस्तानचा लष्करप्रमुख आसिफ मुनीर हिंदू-मुस्लिम द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडून, पाकिस्तानी मुसलमानांना इस्लामचे डोस देऊन आपल्या बुडत्या जहाजाच्या शिडात हवा भरण्याचा प्रयत्न करत होता. भारताच्या या मुत्सद्दीपणामुळे मुनीरच्या शिडातील उरलीसुरली हवाही निघून गेली, हे निश्चित.
 

Operation Sindoor
 
पाकिस्तान पुरता फसलाय..
 
ऑपरेशन सिंदूरचे पाकिस्तानसह जगभरात उमटलेले पडसाद अतिशय बारकाईने अभ्यासण्यासारखे आहेत. मुळात भारताने सिंधू जल करार स्थगित केल्याने पूर्णपणे गोंधळून गेलेले पाकिस्तानचे लष्कर अधिकारी, मंत्री, मुत्सद्दी, पत्रकार गेले दहा-बारा दिवस अक्षरशः सैरभैर झाले होते. भारत पुढे काय करू शकतो, याचे तर्क लावण्यात पाकिस्तानी मीडिया गुंग होता. त्यात भारताने बुधवार, दि. 7 मे रोजी विविध शहरांत घोषित केलेल्या मॉक ड्रिल्समुळे तर ही मंडळी पुरती बावचळून गेली होती. पाकिस्तानातच काय भारतात आणि सार्‍या जगात अनेकजण याचा नेमका अर्थ लावण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करत होते. मॉक ड्रिलची घोषणा म्हणजे त्यानंतर काही ना काही कारवाई होणार, अशी अटकळ सर्वांनीच बांधलेली असताना 7 मेचा दिवस उजाडण्यापूर्वीच भारताने सीमेपलीकडे कितीतरी किलोमीटर्स आत घुसत हवाई हल्ले केले जे पाकिस्तानसाठी अनाकलनीय होते. मग अर्थातच पाकिस्तानने आम्ही भारताची राफेल विमाने कशी पाडली, किती नागरिक मृत्युमुखी पडले, त्यातले कुणीच दहशतवादी कसे नव्हते वगैरे नेहमीची रडारड सुरू केली. परंतु पाकिस्तानचाच माहिती-प्रसारण मंत्री अत्ताउल्लाह करार हा स्काय न्यूज या जागतिक माध्यमसंस्थेच्या यालदा हकीम या महिला पत्रकाराच्या मुलाखतीत पुरता गोंधळून गेल्याने पाकिस्तानच्या दाव्यांना काहीच अर्थ उरला नाही. पत्रकार यालदा हकीम यांनी पाकिस्तानने आजवर दहशतवाद्यांना कसे पोसले, पाकिस्तानचेच मंत्री याची कशी आणि कुठेकुठे कबुली देत होते याची जंत्रीच या तरारपुढे मांडली ज्यावर उत्तर देताना तरारची बोबडी वळली. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी भारताला विश्वासघातकी शत्रू वगैरे म्हणत पाकिस्तान या हल्ल्याचे उत्तर देईल वगैरे वल्गना करणारी पोस्ट एक्सवर शेअर केली. परंतु पाकिस्तानी पंतप्रधानाला तसेही त्यांचे लष्कर जी स्क्रिप्ट लिहून देईल त्यानुसार वागणे-बोलणे, हेच काम असल्याने शरीफ यांना कोणीही गांभीर्याने घेतले नाही. भारतीय माध्यमांमध्ये आणि जगातील अन्य ठिकाणच्या माध्यमांमध्येही या प्रतिक्रियेची गांभीर्याने दखल घेतली गेल्याचे आढळले नाही. इतकंच काय तर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानने भारताची पाच विमाने पाडल्याचा उल्लेख केला. त्यावर पत्रकाराने त्याचे तपशील मागितल्यावर या संरक्षणमंत्र्यांनी चक्क सोशल मीडियाच्या हवाल्याने मी हे सांगत असल्याचे म्हटले. पत्रकाराने ’तुम्हाला इथे सोशल मीडियावरील मजकुराची चर्चा करायला बोलावलेले नाही, गंभीर चर्चेसाठी बोलावले आहे’ असे आसिफ यांना खडसावले आणि पुन्हा तपशील मागितले. त्यावेळी हे संरक्षणमंत्री एकही तपशील देऊ शकले नाहीत. याच ख्वाजा आसिफ यांनी गेल्याच महिन्यात स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानने दहशतवाद्यांना कसे तयार केले, कसा अर्थपुरवठा केला, याची जाहीर कबुली दिली होती.
 

Operation Sindoor  
 
जागतिक माध्यमांतील ’सिंदूर’
 
जगभरातील प्रसारमाध्यमांतून या हल्ल्याची संपूर्ण दिवसभर सविस्तर आणि ठळक अशी दखल घेण्यात आली. बीबीसी न्यूज (युके), ब्लूमबर्ग, असोसिएटेड प्रेस, थॉमसन रॉयटर्स, न्यूयॉर्क टाइम्स, सीएनएन, अल जझीरा, स्काय न्यूज (युके) अशा अनेक वृत्तपत्रे, वृत्तसंस्था, वृत्तवाहिन्यांच्या वेबपोर्टल्सवरील होमपेज (मुखपृष्ठ)अगदी संध्याकाळपर्यंत केवळ ’ऑपरेशन सिंदूर’शी संबंधित बातम्यांनीच भरलेले होते. अपवाद अर्थातच चीनमधील ग्लोबल टाइम्स जो तेथील अन्य प्रसारमाध्यमांप्रमाणेच शासन-नियंत्रित आहे. ग्लोबल टाइम्समध्ये हल्ल्यानंतरचा सुरुवातीचा काही वेळ वगळता नंतर होमपेजच्या एका कोपर्‍यातील चौकटीत याबाबतचे वृत्त आणि अन्य अपडेट्स दिसत होत्या. ग्लोबल टाइम्स व चीनमधील अशा प्रमुख माध्यमांनी अर्थातच चीन सरकारच्या भूमिकेत आपला सूर मिसळत पाकिस्तानी दाव्यांच्या हवाल्याने बातम्या दिल्या. उदाहरणार्थ पाकिस्तानने किती भारतीय लढाऊ विमाने पाडली, किती नागरिक मृत्यमुखी पडले वगैरे. अर्थात, बाकी जागतिक प्रसारमाध्यमांच्या वार्तांकनातही संमिश्र भूमिका होत्याच. आपणापैकी अनेकांना ठाऊक असेल की, आजवर जम्मू-काश्मीरला जागतिक प्रसारमाध्यमांतून ’इंडिया ऍडमीनिस्टर्ड काश्मीर’ किंवा ’इंडिया कंट्रोल्ड काश्मीर’असे संबोधले जाते. तीच बाब पाकव्याप्त काश्मीरच्या बाबतीत. ऑपरेशन सिंदूरच्या बातम्यांबाबतही अशाच शब्दांचा सर्रास वापर होता. बर्‍याच माध्यमांनी पाकिस्तानकडून केलेल्या दाव्यांच्या आधारावर मृतांची आकडेवारी दिली होती. या जागतिक माध्यमसंस्थांमध्ये बहुतांश ठिकाणी त्या-त्या ठिकाणच्या तथाकथित लेफ्ट-लिबरल्सचा कसा वरचष्मा आहे, हे आपण जाणतोच. त्यामुळे हे असे होणे अगदीच स्वाभाविक. नाही म्हणायला पहलगाम हल्ल्याच्या वेळी केलेल्या वार्तांकनांमध्ये बर्‍याच देशांतील माध्यमांनी इंडिया अ‍ॅडमिनिस्टर्ड काश्मीरऐवजी ’भारतातील राज्य जम्मू-काश्मीर’ असा उल्लेख केला होता, ही त्यातल्या त्यात सकारात्मक गोष्ट. कूटनीती फाऊंडेशन या संस्थेने या वार्तांकनाबाबत एक अहवालही नुकताच प्रसिद्ध केला होता, जो इंटरनेटवर उपलब्ध आहे.
 
 
Operation Sindoor लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट केल्याचे भारताने अधिकृतरित्या स्पष्ट केलं. 
 
पुढे काय?
 
भारताच्या या यशस्वी ऑपरेशननंतर आता स्वाभाविकपणे प्रश्न येतो तो म्हणजे पुढे काय? भारतीय मिसाईल्सनी 9 दहशतवादी अड्ड्यांवर घडवलेल्या तांडवाची, त्यात पाकिस्तानच्या झालेल्या नुकसानाची मोजदादही पूर्ण झाली नसेल तेवढ्यात लाहोरच्या लष्करी विमानतळावर झालेल्या स्फोटांच्या बातम्यांनी खळबळ उडाली. लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट केल्याचे भारताने अधिकृतरित्या स्पष्ट केलं. लाहोरसह कराची, सियालकोट वगैरे विमानतळ सध्या ठप्प झालेले आहेत. तिकडे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या 14 सैनिकांना बॉम्बस्फोटात उडवलं. भारत सरकारने ’ऑपरेशन सिंदूर’ अद्याप संपलेलं नसल्याचं सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केलं. त्यामुळे हा सारा विषय कुठपर्यंत जाणार आणि किती काळ चालणार, याचा अंदाज करणं सद्यस्थितीत अशक्य होऊन बसलं आहे. पुढील एक महिना याबाबतीत निर्णायक ठरू शकतो. या एका महिन्यात ज्या घडामोडी घडतील त्यानंतर कदाचित पुढचं एक वर्षही तणावाचं, युद्धजन्य परिस्थितीचं असू शकतं. किंवा कदाचित भारत आपल्या शूर, कर्तृत्ववान सैन्यशक्तीच्या जोरावर सार्‍या जगात कुणीच कल्पना केली नसेल, अशी एखादी गोष्ट द्रुतगतीने पंधरा-वीस दिवसांतही घडवू शकतो. यातील कोणतीच शक्यता याक्षणी नाकारता येऊ शकत नाही. भारत-पाकिस्तानमधील ही युद्धजन्य परिस्थिती जागतिक राजकारण एका अतिशय वेगळ्या, नाजूक टप्प्यावर आलेलं असताना उद्भवली आहे जी वास्तवात भारताच्याच पथ्यावर पडणारी आहे.
 
 या सर्व परिस्थितीचा मोठा फायदा भारताला मिळणार आहे कारण या सर्व महासत्तांना भारतासारख्या नव्या आर्थिक, लष्करी महासत्तेची व येथील बाजारपेठेची आज सर्वाधिक गरज आहे. त्यामुळेच तुर्कीयेसारखा अपवाद वगळता कोणताही मोठा, प्रगत देश ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला नाही.
 
डोनाल्ड ट्रम्प यांनी मुख्यतः चीनची कोंडी करण्यासाठी सुरु केलेल्या ’टॅरिफ युद्धा’मुळे जगात गेल्या महिन्या-दोन महिन्यांत बरीच घुसळण झाली. ही घुसळणही आणखी किती काळ चालेल आणि त्यातून काय निष्पन्न होईल, याचा सध्या कोणालाच अंदाज लावता येत नसल्याने प्रत्येक जण आपापली अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार सांभाळायच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी नवनवी समीकरणे निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. अमेरिकेने निर्माण केलेल्या अस्थिरतेत चीन आपले हातपाय आणखी पसरू पाहतो. युरोप तसाही रशिया-युक्रेन युद्धापासून चाचपडतोच आहे आणि आतातर आणखी गोंधळून गेलेला आहे. या सर्व परिस्थितीचा मोठा फायदा भारताला मिळणार आहे कारण या सर्व महासत्तांना भारतासारख्या नव्या आर्थिक, लष्करी महासत्तेची व येथील बाजारपेठेची आज सर्वाधिक गरज आहे. त्यामुळेच तुर्कीयेसारखा अपवाद वगळता कोणताही मोठा, प्रगत देश ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला नाही. बाकी युद्ध नको, शांतता राखा, सामंजस्याने वाद सोडवा वगैरे उपदेशामृत सर्वच देश एकमेकांना पाजत असतात. परंतु हे उपदेश ऐकायचे किती आणि दुर्लक्षित किती करायचे, याचा निर्णय बलाढ्य देश स्वत:चे स्वतः घेत असतात. लेखात आधी उल्लेखल्याप्रमाणे हा बदलता भारत असल्याने अर्थातच आपण ’ऐकावे जनाचे, करावे मनाचे’ हेच धोरण अंमलात आणले आहे, ज्यात आडकाठी करण्याची सध्यातरी कुणाची कुवत दिसत नाही.
 
 
आजवर पाकिस्तानने जगभरातून भीक मागून केवळ भारताविरोधात दहशतवादी तयार करण्याचं काम केलं आणि सातत्याने भारतावर भ्याड, विकृत दहशतवादी हल्ले केले. पहलगाम हल्ल्याने या विकृतीचं टोक गाठलं. आता शिशुपालाच्या शंभर अपराधांचा घडा भरला आहे. एका जबाबदार, परिपक्व, वेगाने विकसित होत असलेल्या लोकशाही राष्ट्राच्या संयमाचा अंत इस्लामी दहशतवादाच्या या विचारसरणीने पाहिला. परिणामी हा हलकल्लोळ पाकिस्तानच्या नशिबी आला आहे. तो पुढे किती काळ आणि कसा चालेल हे सांगता येणं अशक्य असलं तरी भारताच्या किंबहुना दक्षिण आशियाच्या राजकीय इतिहासातील हा टप्पा ’माईलस्टोन’ ठरतो आहे, हे मात्र निश्चित.

निमेश वहाळकर

सा. विवेकमध्ये कार्यकारी संपादक (डिजिटल) म्हणून कार्यरत.  मूळचे कोकणातील चिपळूण येथील रहिवासी. सर परशुरामभाऊ कॉलेज पुणे येथून पदवी (राज्यशास्त्र) तर रानडे इन्स्टिट्यूट (सा.फु. पुणे विद्या.) येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण.