पाकिस्तानी कलाकारांना “जोर का झटका”

विवेक मराठी    09-May-2025
Total Views |
@बागेश्री पारनेरकर
 

Operation Sindoor  
काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली. भारताने पाकिस्तानची चहूबाजूने कोंडी केली असतानाच पाकिस्तानी कलाकारांवरही बंदी घालण्यात आली आहे. कलेला धर्म नसतो हे ठीक आहे पण कलाकार हा माणूस आहे आणि तो विशिष्ट विचारसरणीने चालतो हे मान्य करावंच लागेल. कलाकारांच्या बंदीवर अनेक मतमतांतरे आहेत. सर्व पाकिस्तानी कलाकार, गायक हे प्रथम पाकिस्तानी मुस्लीम आहेत नंतर कलाकार हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
कोणत्याही दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर फक्त राजकीय, भौगोलिक, आंतरराष्ट्रीय स्तरावरच परिणाम होतात, तणाव निर्माण होतो असं नाही तर सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सगळ्याच पातळ्यांवर त्याचे पडसाद उमटतात. काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. भारताने पाकिस्तानची चारीबाजूने कोंडी केली असून पाकिस्तानवर भारताने डिजिटल मारा सुरू केला आहे. भारताविरोधात गरळ ओकणार्‍या 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनल्सवर बंदी घातली आहे. इतकेच नाही तर पाकिस्तानी कलाकारांना आता जोर का झटका बसला आहे. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याच्या अबीर गुलाल या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. तर ‘मेरे हमसफर’, ‘कभी मैं कभी तुम’ या मालिकांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री हानिया आमिर दिलजीत दोसांझच्या ‘सरदार 3’ या चित्रपटातून भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार होती, पण आता तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे. या व्यतिरिक्त अनेक पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया अकाऊंट बंद करण्यात आले आहेत. शाहरुख खानच्या रईस चित्रपटातून आलेली अभिनेत्री माहिरा खान, अली जाफर, बिलाल अब्बास, सनाम सईद, फवाद खान यांसह काही पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडियाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. पाकिस्तानात चित्रपटात काम करून त्यांना जेवढी प्रसिद्धी मिळाली नाही तेवढी त्यांच्या मालिका भारतात प्रसारित झाल्यानंतर त्यांना मिळाली. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या ’जिंदगी गुलजार है’ आणि ’हमसफर‘ या मालिका प्रचंड गाजल्या. त्यानंतर तो ’खुबसूरत‘, ’ए दिल है मुश्किल‘, ’कपूर अँड सन्स‘ या बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला. भारतात त्याचा चाहता वर्ग वाढल्याने बॉलिवूडचा रस्ता त्याला मोकळा झाला. सोशल मीडियावर या पाकिस्तानी कलाकारांची मोठी क्रेझ आहे. पण भारतीय युजर्सना या कलाकारांच्या खात्यावर क्लिक करताच ’हे खाते भारतात उपलब्ध नाही. आम्ही कायदेशीर विनंतीनुसार हे मर्यादित केले आहे‘, असा संदेश दिसत आहे. आता या कलाकारांना भारतात प्रसिद्धी, फॉलोअर्स, मार्केटिंगचा फायदा घेता येणार नाही.
 
 
दहशतवाद्यांना आश्रय देणार्‍या देशाच्या कलाकारांचा भारतात सन्मान, प्रसिद्धी आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा रस्ता बंद व्हायला हवा, अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे. पण पहलगाम हल्ल्यात धर्म विचारून गोळ्या घातल्या यावर विश्वास नसणारे काही पाकप्रेमी लोक आपल्या समाजात राहतात त्यांना कलाकारांवरची ही बंदी पटत नाही. कला ही धर्म, जात, भाषा याच्या पलीकडे असते अशी ओरड आता काही जण करत आहेत. कलेला धर्म नसतो हे ठीक आहे पण कलाकार हा माणूस आहे आणि तो विशिष्ट विचारसरणीने चालतो हे मान्य करावंच लागेल. 2016 मध्ये उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराने उरी हल्ल्याबाबत शोक व्यक्त केला नव्हता किंवा साधा निषेधही केला नाही. पण त्याच पाकिस्तानी कलाकारांनी उरी हल्ल्याच्या काही महिने आधी पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. मुळात हे पाकिस्तानी कलाकार पैसे कमावण्यासाठी पॅरिसमध्ये जात नाहीत त्यासाठी ते भारतात येतात, त्यांचा हा पैसा पाकिस्तानात जातो. पण भारताविषयी यांच्या मनात जराही प्रेम नाही.
 
 
पहलगाम हल्ल्यानंतर काही पाकिस्तानी कलाकारांच्या प्रतिक्रिया समोर आल्या, त्यांनी वरवर का होईना दुःख व्यक्त केले. कारण या कलाकारांचे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचे स्वप्न टांगणीला लागले आहे. आम्ही पाकिस्तानी असलो तरी तुमच्या दु:खात सहभागी आहोत हे दाखवण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न होता. कारण कलाकाराला मोठे करण्यात भारतीय प्रेक्षकांचा मोठा हात आहे हे त्यांना माहीत आहे. 2016 मध्ये बंदी घातल्यानंतर फवाद खानने बॉलिवूड कोणाच्या बापाचं नाही असे म्हटले होते. पाकिस्तानी कलाकार मूर्ख नाहीत. ते भारताचा द्वेष करतात पण उघडपणे ते बोलू शकत नाहीत. कारण भारतात काम मिळण्याचे आणि पैसे कमवण्याचे मार्ग बंद होतील. सर्व पाकिस्तानी कलाकार, गायक हे प्रथम पाकिस्तानी मुस्लीम आहेत नंतर कलाकार हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
 
 
मुंबईतील जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेन्मेंट समिट 2025 मध्ये अभिनेते जॅकी श्रॉफ यांना याबाबतीत प्रश्न विचारण्यात आला, त्यावर ’आताची परिस्थिती बघता सरकारचा निर्णय योग्य आहे. थोडं अंतर ठेवलेलं आपल्या भल्याचं आहे आणि जोवर पंतप्रधान काही बोलत नाही तोपर्यंत आपण सगळे काय बोलणार‘, असं उत्तर त्यांनी दिलं.
 

Operation Sindoor
पाकिस्तानी कलाकारांच्या उलट्या बोंबा

पहलगामच्या दहशतवादी ह्ल्ल्याला भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले. हानिया आमिर, माहिरा खान या पाकिस्तानी अभिनेत्रींनी भारताकडून झालेल्या या हवाई हल्ल्याचा निषेध केला आहे. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने लेखिका फातिमा भुट्टे यांच्या ट्विटला रिपोस्ट करत अल्लाह आमच्या देशाची रक्षा करो, असे म्हटले आहे. तर अभिनेता फवाद खानने त्याच्या पोस्टमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’ असे लिहिले आहे. शेवटी पाकिस्तानी कलाकारांनी पाकिस्तानचीच बाजू घेतली. आता तरी भारतीय प्रेक्षकांनी यांना डोक्यावर घेणे बंद केले पाहिजे.
 
अभिनेते सुनील शेट्टी यांनीही प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की ’आपल्या देशाची शांतता भंग करणार्‍या आणि निष्पाप लोकांचा जीव घेण्याचा कट रचणा़र्‍या प्रत्येक व्यक्तीवर बंदी आणली पाहिजे. क्रिकेट, फिल्म प्रत्येक क्षेत्रात प्रतिबंध आणले पाहिजे. आम्ही भारतीय धर्मालाच कर्म आणि सेवा मानतो‘.
 
 
ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनीही पाक कलाकारांच्या बंदीला सहमती दर्शवली आहे. ’भारतात नेहमीच पाकिस्तानी कलाकारांचे स्वागत केले जाते, परंतु पाकिस्तानकडून अशी वृत्ती कधीच दिसून आली नाही‘. याबाबतीत 2016 साली उद्योजक मुकेश अंबानी यांनी केलेले विधान महत्त्वाचे आहे. ’सगळ्यात आधी देशाचा विचार व्हायला हवा. त्यानंतर कला आणि संस्कृतीचा. माझ्यासाठी देश पहिला आहे‘. असा विचार जर प्रत्येकाने केला तर याविषयावर वाद घालण्याची गरज पडणार नाही.
 
 
पाकिस्तानी कलाकार भारतात येण्याची कारणे
 
1. पाकिस्तानात चित्रपट क्षेत्राला फारसा वाव नाही. चित्रपटांना फारसे प्रेक्षक मिळत नाहीत.
 
2. बॉलिवूडच्या तुलनेत पाकिस्तानी चित्रपट बाजारपेठ खूपच लहान आहे. बॉलिवूडमध्ये काम केल्यावर जी प्रसिद्धी मिळते ती पाकिस्तानात मिळत नाही. भारतात पाकिस्तानी कलाकारांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे लोकप्रियता आणि करिअरच्या संधी उपलब्ध होतात.
 
 
3. अर्थकारणाच्या दृष्टीने बॉलिवूड आणि पाकिस्तानी चित्रपटसृष्टीत खूप फरक आहे. पाकिस्तानात मिळणार्‍या रकमेपेक्षा भारतात कलाकारांना दुप्पट-तिप्पट रक्कम मिळते. बॉलिवूड जितका पैसा देऊ शकतो तितका पाकिस्तानी उद्योग देऊ शकत नाही.
उदा. मीडिया रिपोर्टनुसार फवाद खान हा पाकिस्तानच्या एका प्रोजेक्टसाठी 2 कोटी मानधन घेतो. तर बॉलिवूड कमबॅकसाठी त्याने 5 ते 10 कोटी मानधन घेतले आहे. पण त्याच्या नवीन चित्रपटावर बंदी घालण्यात आली असून चित्रपटाची गाणीही युट्यूबवरून काढून टाकण्यात आली आहे.
 
 
उदा. हुमायून सईद हा पाकिस्तानचा सर्वात श्रीमंत अभिनेता आहे. पाकिस्तानी रुपयांनुसार त्याची एकूण संपत्ती 1,380 कोटी रुपये आणि भारतीय रुपयानुसार 435 कोटी आहे. तर भारतातील श्रीमंत अभिनेता शाहरूख खानची एकूण संपत्ती 7,300 कोटी रुपये आहे. हुमायून या आकड्याजवळही नाही, ही तफावत आहे.
 
 
4. बॉलिवूडमध्ये खान आणि दाऊद माफियांचे वर्चस्व असल्याने पाकिस्तानी कलाकारांना सहज प्रवेश मिळतो.
 
 
5. पाकिस्तानी अभिनेते आणि अभिनेत्री दिसायला सुंदर असतात. त्यामुळे त्यांच्या सौंदर्यावर भाळणारा एक मोठा चाहता वर्ग भारतात आहे.
 
भारतात होणारे पाकिस्तानी कलाकारांचे लाड थांबणार का?
 
1998 साली पाकिस्तान सरकारने दिलीप कुमार यांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरिक सन्मान ’निशान-ए-इम्तियाज‘ हा पुरस्कार प्रदान केला होता. यानंतर भारतात राजकारण चांगलेच तापले होते. महाराष्ट्रात शिवसेनेने याचा निषेध नोंदवला. यानंतर दुसर्‍याच वर्षी 1999 मध्ये भारत पाकिस्तान दरम्यान कारगिल युद्ध झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलीप कुमार यांनी हा पुरस्कार परत करावा अशी मागणी करत त्यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कलाकार हा त्याच्या कलेने मोठा होतो पण त्याला मोठे करण्यात देशाचा आणि प्रेक्षकांचा मोठा वाटा असतो. कोणत्याही देशातला कलाकार असला तरी त्याच्या कलेचे कौतुक केले पाहिजे. पण देशहित, राष्ट्रप्रेमाचा विषय येतो तेव्हा काही गोष्टींचं भान आपण ठेवले पाहिजे. आज अनेक कलाकारांना भारतीय चित्रपटसृष्टीने ओळख मिळवून दिली आहे. कारण आपल्या भारतीय संस्कृतीत विविध धर्म, कला, संस्कृती यांना सामावून घेण्याची ताकद आहे. कोक स्टुडिओ हा एक प्रसिद्ध म्युझिक शो आहे. भारतातल्या कोक स्टुडिओपेक्षा भारतात पाकिस्तानातील कोक स्टुडिओ अधिक लोकप्रिय आहे. भारतातील लोकप्रियता पाहून निर्मात्यांना आश्चर्य वाटले. दोन्ही देशांमधले संबंध तणावाचे असले तरी कला आणि संस्कृती याविषयी कायमच एक आत्मीयता राहिली आहे. पण ही एकेरी वाहतूक आहे कारण पाकिस्तानात परिस्थिती वेगळी आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने त्याच्या घरी असलेला टीव्ही तोडला, कारण त्याची मुलगी एका भारतीय टीव्ही शोमध्ये दाखवलेल्या आरतीची नक्कल करत होती. यावरून त्यांची मानसिकता लक्षात येते. पण भारतात मात्र आपण त्यांची संस्कृती, परंपरा, प्रेमकथा आवडीने बघतो, त्यांना डोक्यावर घेतो. आताही प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पाकिस्तानी एफएम रेडिओ स्टेशनवर वाजवल्या जाणार्‍या भारतीय गाण्यांवर बंदी घातली आहे. लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार, मुकेश यांची गाणी तिकडे लोकप्रिय आहेत. तरीही या निर्णयाचे पाकिस्तानात कौतुक करण्यात येत आहे. पण आपल्याकडे पाकिस्तानी कलाकारांच्या बंदीवर वाद घातला जातो आहे.
अजून एक मुद्दा ज्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही, बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकार जेव्हा काम करतो तेव्हा त्याने कमावलेल्या प्रत्येक 1 रुपयामागे त्यांना 26 पैसे पाकिस्तान सरकारला कर म्हणून द्यावे लागतात. याचा अर्थ असा की जेव्हा आपण पाकिस्तानी अभिनेत्याला पाहण्यासाठी तिकीट खरेदी करतो तेव्हा अप्रत्यक्षपणे पाकिस्तान सरकारला पैसे देतो. कलाकाराची कला पाहिली पाहिजे, त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांनी भारतात काम करावं, पण तेच सारखे दिसायला लागले तर भारतीय कलाकारांचं काय हाही एक मुद्दा महत्त्वाचा आहे. आपल्याकडच्या चांगल्या कलाकारांवर त्याचा परिणाम होणार. भारतात कलाकारांना देव मानतात, त्यांच्यावर प्रेक्षक अक्षरशः जीव ओवाळून टाकतात, भारतीय प्रेक्षकांची ही नस पाकिस्तानी कलाकारांनी ओळखली आहे. आपल्याकडे येऊन हे कलाकार नाव, पैसा कमावतात पण भारताच्या बाजूने कधी बोलत नाही. त्यामुळे राष्ट्र प्रथम ही भावना प्रत्येक भारतीयांमध्ये निर्माण झाली पाहिजे. भारत-पाकिस्तान मॅच दरम्यान आपले देशप्रेम ओसंडून वाहते, तीच भावना आता गरजेची आहे. पुलवामा हल्ल्यानंतरही काही वर्ष पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी होती. त्यामुळे आताही त्यांनी भारतात काम केले नाही तर काही फरक पडत नाही. पाकिस्तानी कलाकारांच्या बंदीवर गळे काढण्यापेक्षा देशहित सर्वप्रथम त्यानंतर बाकी सगळे ही भावना महत्त्वाची आहे. भारतीय प्रेक्षक म्हणून देशाच्या सुरक्षेचा, देशहिताचा विचार करून पाकिस्तानी कलाकारांचे भारतात होणारे लाड आता तरी थांबवले पाहिजे.