सावरकर व भगत सिंह एकाच परंपरेचे पाईक

विवेक मराठी    03-Jan-2020
Total Views |

***डॉ. नीरज देव***

वीर सावरकर व हुतात्मा भगत सिंह हे परस्परविरोधी व्यक्तित्व असल्याचे सावरकर विरोधक व हिंदुत्ववादाचे विरोधक जे भासवतात, ते तसे नसून वीर सावरकर व भगत सिंह एकाच परंपरेतील वाहक होते, इतकेच नव्हे, तर भगत सिंह सावरकरांच्या शिष्य परंपरेतील होते, सावरकरांचे परात्पर शिष्य होते.

sawarkar_1  H x

''हुतात्मा भगत सिंह व त्यांचे सहकारी हे खरेखुरे देशभक्त असून सावरकर माफीवीर आहेत'' असा वारंवार प्रचार काँग्रेस व अन्य सावरकर विरोधक करतात. वस्तुत: हुतात्मा भगत सिंह गांधी, गांधीवाद व काँग्रेस यांच्या विचारांपासून कैक योजने दूर असून वीर सावरकरांचे व्यक्तित्व, कार्य व विचार या तिन्ही गोष्टींनी प्रभावित होते. इतकेच नव्हे, तर ते एका दृष्टीने पाहू जाता ते सावरकरांचे परात्पर शिष्यच होते.


सावरकर - सशस्त्र क्रांतिकारकांचे कुलपुरुष

चापेकर बंधूंच्या हौतात्म्यातून सावरकरांचे क्रांतिकार्य जन्मलेले होते. 'रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळेना' असा इतिहाससिध्द सिध्दान्त मांडत त्यांनी देशस्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा पर्याय बुध्दिपूर्वक निवडला होता. सशस्त्र क्रांतिकार्यासाठी त्यांनी मित्रमेळा व अभिनव भारताची स्थापना केली. भारतीय क्रांतिकार्याला तत्त्वज्ञानाची जोड असायला हवी, हे ओळखून 'जोसेफ मॅझिनी' '1857चे स्वातंत्र्यसमर' हे दोन अद्भुत ग्रंथ लिहिले. सावरकरांच्या या कृती व शास्त्र अशा दुहेरी कार्यामुळेच सावरकरांना तत्त्वज्ञ क्रांतिकारक व क्रांतिकारकांचे कुलपुरुष असे संबोधले जाते.


आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/


एक-दोन जणांना मारून भारत स्वतंत्र होणार नाही
, त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर उठाव व्हायला हवा, भारताबाहेरील राष्ट्रांकडून साहाय्य मिळायला हवे व इंग्लड संकटात सापडायला हवे अशी साधार योजना त्यांनी आखली होती. उपयुक्त सर्व गोष्टी साधण्यासाठी त्या काळी सर्वोत्तम ठिकाण इंग्रजांची राजधानी लंडनच होती. याच योजनेनिशी ते 1906मध्ये लंडनला पोहोचले. त्यांच्या जादुई व्यक्तित्वाने नि विचाराने भारून लाला हरदयाळ, मदनलाल धिंग्रा, व्ही.व्ही.एस. अय्यर, भाई परमानंद, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय इ.सारखे एकाहून एक सरस तरुण सशस्त्र क्रांतिकार्यात ओढले गेले. याविषयी बोलताना लंडनमधील सावरकरांचे सहकारी एम.पी.टी. आचार्य लिहितात, 'His personal charm was such that a mere shake hand could convert to his views such obstinate men as V V S Aiyar and Har Dayal - not only convert but even bring out the best out of them.' (मराठा, 27 मे 1938.)

याचा अर्थ सावरकरांसोबत हस्तांदोलन करताच अय्यर, हरदयाळांसारखे बुध्दिमान व तेजस्वी तरुण सशस्त्र क्रांतिकारक बनले, हा त्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या आचार्यांचा निर्वाळा सावरकरांच्या अद्भुत व्यक्तित्वाची जाणीव करून देतो.

 

सावरकरांच्या दिव्य प्रभावळीतून बाहेर पडलेल्या लाला हरदयाळांनी व भाई परमानंदांनी देशस्वातंत्र्याचा व सशस्त्र क्रांतीचा सावरकरी विचार अमेरिका-कॅनडात पोहोचवला. कॅनडात बाबा सोहन सिंह भकना व त्यांचे सहकारी विदेशातील भारतीय युवकांवरील अन्याय दूर व्हावा यासाठी व्यासपीठ हवे म्हणून मोठे संघटन उभे करीत होते. मात्र त्याला पाहिजे तशी गती व दिशा मिळत नव्हती. यासाठी त्यांनी लाला हरदयाळांना आमंत्रित केले. लाला हरदयाळांनी तेथील युवकांना सावरकरांनी त्यांना दिलेला देशस्वातंत्र्याचा मंत्र दिला व त्यासाठी सशस्त्र क्रांतिकार्याचा मार्ग दाखविला. हरदयाळांनी बाबा सोहन सिंह भकना इत्यादींसह गदर आंदोलनाला जन्म दिला. गदरच्या मुखपत्रातून सशस्त्र क्रांतिकार्याकडे युवकांना आकर्षित करण्यासाठी लाला हरदयाळांनी सावरकर चरित्र, तसेच विष्णु गणेश पिंगळेंच्या सूचनेनुसार सावरकरांचे ज्वलज्जहाल '1857चे स्वातंत्र्यसमर' छापत हजारों नवयुवकांना देशस्वातंत्र्यासाठी क्रांतिकार्यात ओढून घेतले.


येथे एक बाब नमूद करणे गरजेची वाटते की पुढे बाबा सोहन सिंह भकना डाव्या चळवळीत ओढले गेले व त्यांनी लाला हरदयाळांचे गदरमधील योगदानच नाकारले. याविषयी आपली नापसंती व्यक्त करताना गदरचे एक नेते व सोहन सिंहांचे सहकारी बाबा पृथ्वी सिंह आझाद आपल्या आत्मकथेत लिहितात
,


'कोणीही सुशिक्षित भारतीय, विशेषत: पंजाबी माणूस, लालाजींच्या तेजस्वी जीवनाने एकेकाळी अतिशय प्रभावित झाला होता. लोकांच्या मनातून लालाजींचे स्थान पुसून टाकण्याचं त्याचं हे कृत्य त्यांच्या हीन मनोवृत्तीचंच निदर्शक आहे. भारताच्या या सुविख्यात महापुरुषावर चिखलफेक करणं हा नीचपणा आहे. बाबा सोहन सिंह भकना यांनीही आपल्या लेखातून, भाषणातून व चर्चांमधून लाला हरदयाळ यांचा अवमान करण्याचाच प्रयत्न केला आहे. बाबा सोहन सिंह यांचं व्यक्तित्व ॠषितुल्य आहे, म्हणूनच त्यांच्यासारख्यांना कुणाचा असा द्वेष करणे शोभून दिसत नाही.' (क्रांतिमार्गावरील प्रवासी, पृ. 63.)


लाला हरदयाळांच्या याच प्रभावात कर्तार सिंह सराभा हा
16 वर्षीय नवयुवक आला, जो अतिशय कर्तृत्ववान होता, गदरच्या संपादकीय विभागात तो कार्यरत होता. याचाच अर्थ सावरकर चरित्र व साहित्य कर्तार सिंहांना माहीत होते.


भगतसिंहांचे प्रेरणास्रोत - हुतात्मा कर्तार सिंह सराभा

इंग्रज एखाद्या संकटात सापडले असताना, 1857च्या धर्तीवर सैन्यात विद्रोह पसरवून व इंग्रजांच्या शत्रुराष्ट्राचे साहाय्य घेत स्वातंत्र्य मिळवायचे, अशी सावरकरांची योजना होती. पहिल्या जागतिक महायुध्दाच्या निमित्ताने आलेली ही संधी साधण्यासाठी वीरेंद्रनाथादी काही क्रांतिकारक जर्मन राष्ट्राकडे वळले, तर भारतात सैन्याला चेतवून सशस्त्र क्रांती करण्याच्या इराद्याने कर्तार सिंह सराभा भारतात पोहोचले. भारतातील उठावासाठी त्यांना एखादा कुशल नेता हवा, म्हणून ते भाई परमानंदांसमवेत शोध घ्यायला निघाले, तेव्हा त्यांच्यासमोर रासबिहारी बोस यांचे नाव आले. रासबिहारींचे सहकारी शचींद्रनाथ सांन्याल (सावरकरांसह काळया पाण्यावर होते, यांनीही सावरकरांसारखीच दयापत्रे दिली होती) व नुकतेच अमेरिकेतून आलेले विष्णू गणेश पिंगळे नंतर कर्तार सिंहांचे महत्त्वाचे साथीदार बनले. स्वतः रासबिहारी स्वा. सावरकरांच्या प्रभावाखाली होते. सावरकरांना ते आपले स्फूर्तिस्थान मानीत. (टू ग्रेट इंडियन रिव्होल्यूशनरीज - उमा मुखर्जी, पृ. 157.) सावरकरांचा स्वातंत्र्यसिध्दीचा मार्ग त्यांना तंतोतंत मान्य होता. साप्ताहिक फ्री हिंदुस्थानच्या 27 जानेवारी 1946च्या अंकात वर्णित एका वार्तेनुसार टोकियो आकाशवाणीवरून बोलताना रासबिहारी सावरकरांना उद्देशून म्हणाले होते,

''सावरकरजी, आकाशवाणीवरून तुम्हाला अभिवादन करण्यात मला माझ्या एका ज्येष्ठ सहकाऱ्याचा सन्मान केल्याचा आनंद लाभत आहे. तुम्हाला वंदन म्हणजे प्रत्यक्ष त्यागमूर्तीलाच वंदन करणे होय. ...तुमचा सिध्दान्तच स्वातंत्र्यसिध्दीचा मार्ग आहे खरे आहे.''


संबंधित लेख : सावरकरद्वेषाची कावीळ झालेले डोळे

हे सर्व इतक्या विस्ताराने देण्याचे कारण म्हणजे कर्तार सिंह सराभांनी ज्यांच्या उद्बोधनातून प्रेरणा घेतली, ते लाला हरदयाळ सावरकरांचे शिष्य, ज्यांच्यासमवेत कर्तार सिंह पंजाबात उठावणी करण्यासाठी फिरत होते, ते भाई परमानंद सावरकरांकडून प्रतिज्ञाबध्द झालेले, ज्यांच्या नेतृत्वात कर्तार सिंह काम करू इच्छित होते ते रासबिहारी बोस सावरकरांच्या पूर्ण प्रभावात आणि ज्यांच्यासह ते फासावर चढले, ते विष्णू गणेश पिंगळे सावरकरांच्याच प्रभावात. असा चोहो बाजूंनी सावरकर प्रभाव असताना, '1857चे स्वातंत्र्यसमर' या सावरकरांच्या प्रस्फोटक ग्रंथाचे ज्याने अवगाहन केलेले आहे, असा कर्तार सिंहांसारखा तरुण सावरकर प्रभावातून मुक्त असण्याची संभावना फार कमी होती. पण अतिशय लहान वयात फासावर चढल्याने व सशस्त्र क्रांतिकार्यात बाळगल्या जाणाऱ्या गुप्ततेमुळे कर्तार सिंह सराभा त्यांचा सावरकरांसोबतचा अनुबंध कदाचित व्यक्त करू शकले नसावेत.

 
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

कर्तार सिंह सराभाच्या बलिदानाने सरदार भगत सिंह अतिशय प्रभावित होते. भगत सिंहांच्या संपूर्ण दस्तऐवजाचे संपादक लिहितात, ''शहीद कर्तार सिंहांचे चित्र भगत सिंह सदैव जवळ बाळगत. ते म्हणत, 'हा माझा गुरू, बंधू व सखा आहे.''(भगत सिंह संपूर्ण दस्तऐवज, पृ. 138.)

आता नीट बघा, वीर सावरकरांपासून हरदयाळ व परमानंद, त्या उभयतांपासून कर्तार सिंह सराभा आणि कर्तार सिंहांपासून भगत सिंह ही परंपरा स्पष्टपणे दिसू लागते. पण ती एवढीच मर्यादित नव्हती, तिला आणखीही अनेक आयाम होते.

साथीदारसुध्दा सावरकरांच्या प्रभावात

भगत सिंहांसह फासावर चढलेले हुतात्मा राजगुरू महाराष्ट्रात जन्मलेले होते. ते बालवयापासून सावरकरांच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकत आलेले होते. सावरकरांचे ज्येष्ठ बंधू क्रांतिवीर बाबाराव सावरकरांकडून त्यांनी सशस्त्र क्रांतिकार्याची दीक्षा घेतली होती. (राजगुरू द इन्व्हिंसिबल रिव्होल्यूशनरी - अनिल वर्मा, पृ. 108.) बाबाराव सावरकर व चंद्रशेखर आझाद यांचे संबंध सर्वविदितच आहेत. बलिदान होण्याच्या दोनच दिवस आधी आझाद बाबारावांना भेटल्याचा उल्लेख बाबारावांचे चरित्रकार द.न. गोखले करतात (पृ. 94.) भगत सिंहांचे आणखी एक सहकारी यशपाल सावरकर बंधूंविषयी नितांत आदर व श्रध्दा असल्याचे लिहितात (सिंहावलोकन, 110.) भगत सिंहांचे सहकारी भगवतीचरण व्होरा व दुर्गाभाभी यांचेही सावरकर बंधूंशी संबंध असल्याचे अनेक दाखले मिळतात. याचाच अर्थ भगत सिंह आपल्या प्रेरणास्रोतांकडून व सहकाऱ्यांकडून सावरकरांशी दुतर्फा जुळलेले होते.

भगत सिंहाचे पक्षपाती चरित्रकार

भगत सिंहांचे बहुतेक चरित्रकार डाव्या विचारसरणीचे होते. आधी निष्कर्ष ठरवून, सत्याचा अपलाप करीत इतिहास लिहिण्याची डाव्यांची मानसिकता सर्वज्ञात आहे. याच लेखात गदरी बाबा पृथ्वीसिंह आझादांची साक्ष घेत गदरी बाबा, सोहन सिंह भकना इ.बाबत लेखकाने ती उघडी पाडली आहे.

book_1  H x W:

अशीच मानसिकता ठेवत बहुतेक चरित्रकारांनी भगत सिंहांना लेनिनच्या छायेत उभे करीत सावरकरांची परंपरा साफ नाकारली आहे. इतकेच नव्हे, तर शक्य तेथे सावरकरांना धार्मिक, मागास तंत्रज्ञान वापरणारे, सावरकर व भगत सिंह परस्पर विरोधी प्रेरणा असलेले होते अशीच रचना केलेली आढळते. याला भगत सिंहांचे डाव्या विचारसरणीचे साथीदार मन्मथनाथ गुप्त, यशपाल हेसुध्दा अपवाद नाहीत. इतकेच नव्हे, तर सावरकरांनी भगत सिंहांच्या फाशीबाबत चकार शब्द उच्चारला नव्हता असा आरोप करायला चमनलाल मागेपुढे पाहत नाहीत, पण सारे नेमके उलटे आहे.


भगत सिंह सावरकरांच्या प्रभावात


सन
1928 साली महाशिवरात्रीच्या आदल्या रात्री शनिवार 12 फेब्रुवारी रोजी भगत सिंह राजगुरूंसह वीर सावरकरांना भेटण्यासाठी रत्नागिरीला आले होते, अशी आठवण वामनराव चव्हाणांनी सांगितली आहे. (रत्नागिरी पर्व - बाळाराव सावरकर, पृ. 190.) असे घडले असणे असंभवनीय नाही, कारण क्रांतिकारकांच्या मंत्रदृष्टया ॠषीला भेटण्यासाठी अनेक क्रांतिकारक वाकडी वाट करीत रत्नागिरीला येत. पण या भेटीबाबत सावरकर व भगत सिंह दोघेही मौन असले, तरी भगत सिंहांचे साहित्य सावरकर संपर्काची साक्ष द्यायला पुरेसे आहे.

भगत सिंहांच्या संपूर्ण दस्तऐवजाचे (हिंदी) निरीक्षण केले असता ध्यानात येते की भगत सिंहानी 'लाइफ ऑफ बॅरिस्टर सावरकर' हे चित्रगुप्त (सावरकरांनी त्या वेळी घेतलेले छुपे नाव) लिखित चरित्र वाचले होते व त्यामुळे ते प्रभावित होते. (भगत सिंह दस्तऐवज, पृ. 171.) सावरकरांचे '1857चे स्वातंत्र्यसमर', 'हिंदुपदपादशाही' त्यांनी वाचली होती, इतकेच नव्हे तर सावरकरांच्या 'श्रध्दानंद'चेही ते वाचक होते. याशिवाय सावरकरांचा 'दोन शब्दात दोन संस्कृती' हा पुरोगामित्वाचे चपखल दर्शन देणारा अप्रतिम लेख भाई परमानंदांनी पंजाबीत छापला होता, तो भगत सिंहांच्या वाचण्यात नक्कीच आलेला असावा.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/


कल्पना करा
, एम.पी.टी. आचार्य म्हणतात तसे केवळ सावरकरांशी हस्तांदोलन करताच लाला हरदयाळ, अय्यर यांसारखे धुरंधर सावरकरांचे अनुयायी होत असतील, तर सावरकरांचे साहित्य वाचणारा भगत सिंहांसारखा संवेदनशील तरुण सावरकर प्रभावापासून मुक्त कसा राहणार?


सावरकरी परंपरेचे वाहक भगत सिंह

एखाद्याचे साहित्य वाचलेले असणे याचा अर्थ कदापि असा होत नाही की त्यातील बाबी तुम्हाला मान्यच आहेत, मात्र वाहक वा प्रचारक असण्याचा अर्थ त्या बाबी तुम्हाला मान्य आहेत असा होत असतो. सरदार भगत सिंह सावरकर साहित्याचे केवळ वाचकच नव्हते, तर प्रचारकही होते. त्या काळी दुर्मीळ असलेले सावरकरांचे '1857चे स्वातंत्र्यसमर' या प्रस्फोटक ग्रंथाचे प्रकाशन त्यांनी केले होते. श्रध्दानंदमधील सावरकरांचा 'अत्याचार शब्दाचा अर्थ' ( गांधी गोंधळ पृ. 38) हा लेख भगत सिंहांनी 'आतंक के असली अर्थ' या नावाने मे 1928मध्ये भाषांतरित करून छापला होता. (भगत सिंह दस्तऐवज, पृ. 243.) ज्याप्रमाणे श्रध्दानंदातून सावरकरांनी क्रांतिकारकांची ओळख करून दिली, त्याचप्रमाणे किरतीमधून भगत सिंहांनी पंजाबी जनांना क्रांतिकारकांची ओळख करून दिली. आणखी एक बाब म्हणजे शचींद्रनाथ सांन्यालच्या आईंच्या निधनानंतर त्यांच्यावर 'वीरमाता क्षीरोदवासिनी देवी' या शीर्षकाचा लेख सावरकरांनी मे 1928मध्ये लिहिला. त्यानंतर भगत सिंहांनी सप्टेंबर 1928मध्ये त्यांच्यावर 'युगांतकारी माँ' हा लेख लिहिला. हे केवळ अनुकरण वा योगायोग नव्हता, तर एका समान परंपरेचे पाईक असणे होते.


सावरकरभक्त भगत सिंह

मूळ हिंदी भाषेतील भगत सिंहांच्या दस्तऐवजाचे परिशीलन केले असता, भगत सिंहांनी गांधी, काँग्रेस, सुभाषचंद्र, नेहरू व ज्यांच्या अवमाननेसाठी त्यांनी साँडर्सला मारले, त्या लाला लजपत राय यांच्यावरही या ना त्या निमित्ताने टीका केलेली आढळते. 'दयापत्रे धाडणाऱ्या', 'जातीयवादी' सावरकरांवर ते तशी टीका करताना आढळत नाहीत. उलट वारंवार सावरकरांची प्रशंसाच करताना सापडतात.


यातील एक प्रसंग म्हणजे सावरकरांचे
'1857चे स्वातंत्र्यसमर' वाचताना भगत सिंहांची अवस्था कशी झाली, याचे त्यांचे सहकारी राजाराम शास्त्रींनी केलेले वर्णन होय. शास्त्री लिहितात,


'वीर सावरकर द्वारा लिखित '1857 का स्वातंत्र्य समर' पुस्तक ने भगतसिंह को बहुत अधिक प्रभावित किया था। यह पुस्तक भारत सरकार द्वारा जब्त कर ली गई थी। मैने इस पुस्तक की बहुत प्रशंसा सुनी थी और इसे पढने का बहुत ही इच्छुक था। पता नहीं कहाँ से भगत सिंह को यह पुस्तक प्राप्त हो गई थी। वह एक दिन इसे मेरे पास ले आये। जिससे ली होगी उसे जल्द वापस करनी होगी, इसलिए वह मुझे बहुत कहनेपर देने को तैय्यार नहीं हो रहें थे। पर जब मैंने जल्द से जल्द पढकर उसे अवश्य लौटा देने का पक्का वायदा किया, तब उन्होंने वह मुझे केवल 36 घंटे के लिए पढने को दी। उसको मैं कभी नहीं भुला सकता। मैंने एक वक्त खाना नही खाया और रात दिन उसे पढता ही रहा। पुस्तक ने मुझे बहुत ज्यादा प्रभावित किया ।भगत सिंह के आने पर मैंने पुस्तक की बहुत प्रशंसा की।' (अमर शहिदों के संस्मरण, पृ. 89, 90.)


पुढे राजाराम शास्त्री भगत सिंहांनी स्वातंत्र्यसमर कसे छापले याचे वर्णन करतात. दुर्दैवाने भगत सिंहांनी प्रकाशित केलेल्या स्वातंत्र्यसमरावरील भूमिका प्रस्तुत दस्तऐवजांत उपलब्ध नसली
, तरी त्यांना सावरकरांच्या या ग्रंथाविषयी काय म्हणायचे होते, ते त्यांच्या '10 मई का शुभ दिन' या लेखात सापडते ते लिहितात,


'जहा तक हमें पता हैं, इस आजादी की जंग का एकमात्र स्वतंत्र इतिहास लिखा गया, जोकि बैरिस्टर सावरकर ने लिखा था और जिसका नाम 1857 की आजादी की जंग का इतिहास (The history of Indian War of Independence 1957) था।' (भगत सिंह दस्तऐवज, पृ. 172.)


अशा प्रकारची प्रशस्ती देत सावरकरांनी
1957चा अर्ध शताब्दी महोत्सव लंडनमध्ये कसा साजरा केला, त्याचे वर्णन भगत सिंह करतात. 'श्री मदनलाल धिंग्रा' या लेखात मदनलाल कसे स्वच्छंदी, ऐशआरामी जीवन त्यागून देशभक्त बनले, इ. माहिती देत सावरकरांनी मदनलालच्या घेतलेल्या परीक्षेचे वर्णन करीत भगत सिंह भावविभोर होऊन लिहितात,

 

'हम दुनियादार क्या जानें, मौत के विचार तक से डरनेवाले हम कायर लोग क्या जाने कि देश की खातिर कौम के लिए प्राण दे देने वाले वें लोग कितने ऊंचे, कितने पवित्र और कितने पूजनीय होते हैं।'' (भगत सिंह दस्तऐवज, पृ. 167.)


येथे भगत सिंह स्वत:ला
'दुनियादार', 'मौत से डरनेवाले', 'कायर' म्हणवतात, तर सावरकरांना व धिंग्रांना 'पवित्र व पूज्य' म्हणतात, हे भगत सिंहांचा दाखला देत सावरकरांना कायर म्हणणाऱ्यांनी विसरू नये. याच लेखात मदनलालच्या निषेध सभेत सावरकरांच्या वर्तनाने प्रभावित होऊन ते सावरकरांना 'वीर' संबोधतात,


'बडे बडे प्रस्ताव पास हुए सब उनकी निंदा में। पर उस समय भी एक सावरकर वीर थे, जिन्होंने खुल्लम खुल्ला उनका (मदनलाल का) पक्ष लिया।' (भगत सिंह दस्तऐवज, पृ. 167.)

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/


सावरकरांवर पामरने केलेला हल्ला व त्या वेळचे सावरकरांचे धीरोदात्त
, निश्चल वर्तन भगत सिंहाच्या मन:पटलावर अमिट छाप पाडून जाते, हे त्यांच्या लिखाणात स्पष्टपणे दिसते. 'विश्वप्रेम' या लेखात भगत सिंह सावरकरांचे नितांत आदराने वर्णन करतात,


'विश्वप्रेमी वह वीर है जिसे भीषण विप्लववादी, कट्टर अराजकतावादी कहने में हम लोग तनिक भी लज्जा नही समझतें - वही वीर सावरकर। विश्वप्रेम की तरंग में आकर घास पर चलते चलते रुक जाते कि कोमल घास पैरों तले मसली जायेगी।' (मतवाला, 15 22 नवम्बर 1924, भगत सिंह दस्तऐवज पृ. 93.)


वीर सावरकरांचे एवढे सटीक वर्णन सशस्त्र क्रांतिकारकांपैकी लंडनमध्ये सावरकरांसोबत असलेल्या निरंजन पालांच्या व्यतिरिक्त भगत सिंहांनीच केलेले दिसते. याचाच अर्थ सशस्त्र क्रांतिकारक सावरकरांचे मानवतावादी विचार व भावना त्यांना चांगल्याच परिचित होत्या. ते सावरकरांना चांगल्या प्रकारे ओळखत होते.


सावरकर साहित्यात भगत सिंह

सावरकरांना भगत सिंहाविषयी केवळ सन्मानच नाही, तर ममत्व वाटत होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भगत सिंहांच्या हौतात्म्यानंतर सावरकरांनी केलेली कविता. या कवितेत सावरकर गातात,


जा हुतात्म्यांनो
, अहा!

साक्ष ठेवुनि शपथ घेतो आम्हि उरलो ते पहा!

शस्त्रसंगर चंड हा

झुंजवुनि कीं, जिंकुची स्वातंत्र्यविजयासी पहा!

(स सा वा खंड 7, पृ . 139.)

 

सावरकरांची काव्यप्रतिभा जागृत व्हावी इतकी त्यांना ही घटना महत्त्वाची वाटली. येथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मदनलाल, कान्हेरे, कर्वे व देशपांडे या हुतात्म्यांवरही सावरकरांनी अशा प्रकारची कविता केली नव्हती. त्यांनी याआधी केवळ चापेकरांवरच अशी कविता केली होती. त्या कवितेतील अन या कवितेतील हुतात्म्यांना आश्वस्त करणारा व आपले दायित्व आपण विसरत नसल्याचा भाव ताडून पाहता सावरकरांच्या हृदयातील भगत सिंहांचे स्थान अधिकच अधोरेखित होते.
 
 


येथे मुद्दाम नमूद करण्यासारखी एक घटना म्हणजे
, भगत सिंहादींना फाशीची शिक्षा देण्यात आल्याचे सावरकरांना वरवंडे गावी एका शाळेच्या कार्यक्रमादरम्यान कळाले. ते वृत्त ऐकताच 'वीर सावरकरांच्या चर्येवर विलक्षण दु:खाची छाया पसरली. वीर सावरकरांचे डोळे अश्रूंनी डबडबले' अशी साक्ष त्या ठिकाणी उपस्थित स.दी. पाटील देतात. (सावरकर यांच्या आठवणी, पृ. 48.) भगत सिंहांच्या हौतात्म्यावर सावरकर मौन पाळतात म्हणून जे गळा काढतात, त्यांना ही कविता व स.दी. पाटलांची आठवण सणसणीत चपराक आहे.


याशिवाय नास्तिकता
, पुरोगामित्व, मुस्लीम मानसिकता इ. अनेक बाबीत सावरकर व भगत सिंह यांच्यात विचार साम्य दिसते, हे सारे निःपक्षपातीपणे पाहता, आपल्याला असे म्हणता येते की वीर सावरकर व हुतात्मा भगत सिंह हे परस्परविरोधी व्यक्तित्व असल्याचे सावरकर विरोधक व हिंदुत्ववादाचे विरोधक जे भासवतात, ते तसे नसून वीर सावरकर व भगत सिंह एकाच परंपरेतील वाहक होते, इतकेच नव्हे, तर भगत सिंह सावरकरांच्या शिष्य परंपरेतील होते, सावरकरांचे परात्पर शिष्य होते.


डॉ. नीरज देव

(लेखक मानसोपचारतज्ज्ञ असून 'दशग्रंथी सावरकर' या पीएच.डी.तुल्य सन्मानपत्राने सन्मानित आहेत.)

drneerajdeo1@gmail.com

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/