मानवतेच्या मुळावर उठलेली मानसिकता

विवेक मराठी    01-Jul-2022   
Total Views |
राजस्थानमध्ये नुकतीच कन्हैयालाल तेली या शिंपीकाम करणार्‍या हिंदूची झालेली हत्या ही केवळ अमानुष हत्या नाही, तर जिहादी मानसिकता कुठल्या थराला जाऊ शकते याचे अगदी अलीकडचेे आणि अतिशय भयावह असे ते उदाहरण आहे. एका सर्वसामान्य व्यक्तीची केलेली निर्घृण हत्या असे समजणे ही दिशाभूल ठरेल. ही दहशतवाद्यांनी केलेली हत्या आहे आणि याचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत पोहोचतात, हे आता उघड झाले आहे. 
 
udaypur
या हत्येच्या मुळाशी असलेली घटना म्हणजे, भाजपातून निलंबित करण्यात आलेल्या पक्षप्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान केलेले विधान. त्या विधानाला ‘वादग्रस्त’ हे लेबल लावत त्याविरोधात रान उठवण्यात आले आणि त्याची परिणती नुपूर शर्मा यांच्या निलंबनात झाली. वास्तविक त्या जे बोलल्या ते हदिसमध्ये लिहिलेले आहे, हिंदूंविरुद्ध सातत्याने विखारी बोलणारा झकीर नाईक याच्या भाषणात त्याचे दाखले नेहमी येतात.. त्या वेळी कोणी मुस्लीम त्या विधानाचा निषेध करत नाही. मात्र तेच वक्तव्य अन्य धर्मीयांनी केले, तर त्या धर्मातले कट्टरवादी त्या व्यक्तीचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत. ही दुटप्पी मानसिकता असली, तरी त्या विरोधात भीतीपोटी, दडपणापोटी कोणी बोलत नाहीत, म्हणून अशांचे अधिक फावले आहे.
जिहादी मानसिकतेचे मुसलमान हे पराकोटीचे धर्मांध असतात. त्या धर्मवेडेपणातूनच धर्मासाठी अशा प्रकारे आयुष्य पणाला लावण्याची चूक ते करतात. परधर्मीयांना जगण्याचा हक्क नाकारत त्यांची हत्या करतात. त्यासाठी स्वत:च्या आयुष्यावरही पाणी सोडत जिहाद पुकारतात. जिहाद म्हणजे मानवतेच्या मुळावर उठणे, असा त्या संकल्पनेचा अर्थ लावत ते त्यानुसार वागत असतात. त्यांची अशी कट्टर मानसिकता होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे शिकण्यासाठी त्यांनी स्वेच्छेने वा समाजाच्या दबावामुळे शाळेऐवजी मदरशाची केलेली निवड. या मदरशांमध्ये पद्धतशीरपणे त्यांच्या विचारप्रक्रियेवर जिहादी मानसिकतेचे केले जाणारे आरोपणच तिथे शिकणार्‍या मुलांना एका विनाशी वाटेवर आणून सोडते. ते एकतर जिहादी विचारसरणीचे समर्थक तरी होतात किंवा हाती शस्त्र घेऊन काफरांच्या जिवावर उठलेले जिहादी. अगदी पोरसवदा, कोवळ्या वयाचे मुस्लीम तरुण स्वत:च्या भविष्याचा, कुटुंबाचा कसलाही विचार न करता जिहादी बनायला तयार होतात ते अशा मदरशांमुळे, भावना भडकवणारी भाषणे देणार्‍या मुल्लामौलवींमुळेे आणि दिशाभूल करणार्‍या त्यांच्या नेत्यांमुळे. आधुनिक शिक्षणाच्या अभावातून, किंबहुना त्याविषयी रुजवण्यात आलेला द्वेषातून या धर्माचे तरुण अनुयायी दहशतवादाच्या वाटेवर चालत आहेत.
 
 
आणि त्याचबरोबर त्यांच्या या दुर्दशेला कारणीभूत आहेत ते केवळ मतपेढीच्या स्वार्थापोटी जिहादी मानसिकतेच्या मुस्लिमांचे लांगूलचालन करणारे, त्यांना पाठीशी घालणारे काँग्रेससारखे राजकीय पक्ष.. केवळ काँग्रेसच नव्हे, तर ‘आप’सारखा पक्ष, ममता बॅनर्जी यांचा तृणमूल पक्ष. हे सगळे अप्रत्यक्षपणे जिहादी मानसिकता बळकट करण्याचे काम करत आहेत, म्हणून तेही तितकेच गुन्हेगार आहेत.
 
 
 
येथील बहुसंख्य मुस्लिमांची आधुनिक शिक्षणाशी नाळ जोडली गेली नाही, त्याला राज्यकर्त्यांनी केलेले लांगूलचालनही कारणीभूत आहे. (अर्थात, ज्यांची आधुनिक शिक्षणाशी नाळ जोडली गेली, त्यातलेही अनेक मुस्लीम कडव्या जिहादी विचारसरणीने भारले गेल्याची आणि दहशतवादाच्या वाटेवर गेल्याचीही उदाहरणे आज जगभर सापडताहेत, हेही दुर्लक्ष न करता येण्याजोगे.) स्वातंत्र्यानंतर स्वेच्छेने या देशात राहिलेल्या मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्यात भारतीयत्व रुजवण्यासाठी त्यांना आग्रहपूर्वक आधुनिक शिक्षणाच्या वाटेवर आणून सोडणे हे तत्कालीन राज्यकर्त्यांचे परम कर्तव्य होते. त्याचे महत्त्व लक्षात न घेता, त्यांच्या अविचारी मागण्या पूर्ण करण्यातच तत्कालीन राज्यकर्त्यांनी धन्यता मानली. कायद्यापासून सगळ्या गोष्टीत त्यांचे पुरवले गेलेले हट्ट हे त्याचेच द्योतक आहे.
 
 
 
राजस्थानातील काँग्रेसच्या राजवटीत गेले काही महिने एकट्यादुकट्या हिंदूवर, तसेच हिंदू जमावावर हल्ले होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्या विरोधात तेथील हिंदू संघटनांनी उठवलेल्या आवाजाकडे इथल्या राज्य सरकारने दुर्लक्ष केले आणि त्यामुळेच या राज्यातले दहशतवादी वृत्तीचे मुस्लीम निर्ढावले. कन्हैयालालसारख्या एका सर्वसामान्य हिंदूची अमानुष हत्या आणि त्या हत्येचा व्हिडिओ व्हायरल करण्यापर्यंत हे धाडस वाढले, ते त्यातूनच. या व्हिडिओमुळेे जिहादी मनोेवृत्तीच्या गटाचा उन्माद वाढला आणि तेथील हिंदू अधिकाधिक भेदरले.
 
 
आपल्याला राज्यकर्त्यांचे पाठबळ आहे, समाजातल्या दुटप्पी पत्रकारांचे, तथाकथित सेलिब्रेटींचे पाठबळ आहे, स्वत:ला डावे विचारवंत म्हणवणारे आपली वर्षानुवर्षे पाठराखण करत आले आहेत याची पक्की खात्री असल्यानेच ही मानसिकता आणि हे अमानुष क्रौर्य वाढीला लागले आहे. तेव्हा कन्हैयालाल यांच्या हत्येमागे एक-दोन मारेकरी नाही, तर मारेकर्‍यांची फौज आहे, हे लक्षात घेऊन त्यांच्या बंदोबस्तासाठी केंद्र सरकारने पावले उचलायला हवीत.
दहशतवादाचा प्रश्न एखाद्या धर्मापुरता मर्यादित नाही, तर मानवतेच्या मुळावर उठलेली ही मानसिकता आहे. ती समूळ नष्ट व्हायला हवी. हे काम हिंदूबहुल असलेला आपला देशच करू शकतो. ती आपल्या धर्माची अंगभूत शक्ती आहे. आणि त्यासाठी लागणारी धमक आजच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आहे.