असे निवडणूक विश्लेषक काय कामाचे?

विवेक मराठी    07-Dec-2023   
Total Views |
 तिन्ही राज्यांमधली मतांची टक्केवारी  सांगतात. ती सांगून झाल्यावर या चारही राज्यांत भाजपाला आणि काँग्रेसला मिळालेल्या मतांची बेरीज करून ती समोर ठेवतात. हरलेल्या काँग्रेसला भाजपापेक्षा साडेनऊ लाख मते जास्त मिळाली आहेत, हे त्यांना या द्राविडी प्राणायामातून सुचवायचे आहे. या करामतीमुळे कदाचित काँग्रेसचे सांत्वन होईल, पण ज्या मतदाराने भाजपाच्या हाती सत्ता दिली आहे, तो फसणार नाही. आपल्या या मुद्द्याकडे प्रेक्षकांनी दुर्लक्ष केले, तर निवडणूक निकालांच्या इतिहासाकडे लक्ष द्या, असे ते सुचवतात. विधानसभा मिळाली की लोकसभाही जिंकता येते अशी काही काळ्या दगडावरची रेघ नाही याला इतिहास साक्षी आहे, असे सांगत त्याच्या समर्थनासाठी सोयीची जंत्री सादर करतात.
 
नुकत्याच झालेल्या 5 राज्यांतल्या निवडणुकांकडे आगामी लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून पाहिले गेल्याने सत्ताधारी, विरोधक, वृत्तवाहिन्या, राजकीय विश्लेषक-अभ्यासक, निवडणूक विश्लेषक यांच्यासह राजकारणाविषयी सजग असलेल्या सर्वसामान्य भारतीयांनाही या निकालाविषयी औत्सुक्य होते. ते औत्सुक्य आता शमले असून पाचपैकी तीन राज्यांत भाजपाच्या हाती सत्तासूत्रे आली आहेत. या निकालाने भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाचे, ऊर्जेचे नवे वारे वाहू लागले असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांना नवे बळ प्राप्त झाले आहे. मतमोजणीनंतर झालेल्या विजयी सभेत पंतप्रधान मोदींनीही कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आवाहन करताना, हीच हॅटट्रिक लोकसभा निवडणुकीतही होईल, असा विश्वास व्यक्त केला.
 
vivek
 
पाचपैकी तीन राज्यांत निर्णायक बहुमताने सत्ता हाती घेणार्‍या भाजपाविषयी मतदानोत्तर झालेल्या कल चाचण्या (एक्झिट पोल) काही वेगळेच सांगत होत्या. प्रत्यक्ष निकालानंतर या कल चाचण्यांचेही हसे झाले. एवढेच नव्हे, तर तेलंगणात भाजपाने एका जागेवरून नऊ जागांपर्यंत मारलेली मजल आणि मिझोराममध्ये ख्र्रिश्चनबहुल भागात भाजपाला मिळालेल्या दोन जागा यानेही अनेक तथाकथित पुरोगामी अभ्यासक कोड्यात पडले. याचे कारण त्यांना जमिनीवर काय चालले आहे याचे भान नाही आणि हिंदुत्वद्वेषाची आणि मोदीद्वेषाची झापडे दूर करून वास्तवाचा अभ्यास करण्याची अद्यापही मानसिकता नाही. ही हटवादी मानसिकताच त्यांची विश्लेषणे हास्यास्पद बनवते आहे. पुरोगाम्यांच्या जगात विचारवंत म्हणून विशेष स्थान असणारे, निवडणूक विश्लेषक (सेफॉलॉजिस्ट) समजले जाणारे योगेंद्र यादव अशांपैकीच एक. त्यांनी पाचपैकी चार राज्यांच्या निवडणूक निकालानंतर मिळालेल्या मतांचे, टक्केवारीचे केलेले विश्लेषण आणि घेतलेला भविष्यवेध म्हणजे कागदावर आकडेमोडीच्या मारलेल्या माकडउड्या आहेत. मोदीमॅजिक अमान्य करण्यासाठी चाललेला हा आटापिटा हास्यास्पद आणि करुण आहे. मोदींनी बहुमताने सत्ता प्राप्त करण्यासाठी जे विचारपूर्वक नियोजन केले, त्यासाठी कार्यकर्त्यांनी एकेका मतदारसंघात जी मेहनत घेतली, त्यातून भाजपाला हे यश मिळाले आहे. असे मोदीमॅजिक ज्याला प्रत्यक्ष केलेल्या कामाचा आधार आहे, ती काही हवेतली जादू नाही की निव्वळ कागदावरची गणितसदृश आकडेमोड नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपा विजयाची हॅटट्रिक करेल असे मोदींनी जाहीरपणे आणि ठामपणे म्हटल्यामुळे दुखावले गेलेले योगेंद्र यादव हे मानायलाच तयार नाहीत. मोदींनी हे मनोवैज्ञानिक युद्ध सुरू केले असून हॅटट्रिकविषयी सुरू केलेला प्रोपोगंडा हाही त्याचाच भाग आहे, असे यादव यांना ठामपणे वाटते आहे. म्हणून त्यांनी जनप्रबोधनासाठी आणि पराजयाने विकल झालेल्या काँग्रेसच्या सांत्वनासाठी एक विश्लेषणात्मक ध्वनिचित्रफीत तयार केली. ही प्रसारित झाली आहे ‘द वायर’ या वेब पोेर्टलवरून. निवडणूक निकालातील तथ्ये पद्धतशीरपणे वळचणीला टांगत ती करण्यात आली आहे. अर्थात, योगेंद्र यादव आणि वायर दोघांकडूनही हेच अपेक्षित आहे.
 
 
भाजपाला तीन राज्यांत मिळालेल्या विजयाला हॅटट्रिक म्हणणे मिथक आहे, हे प्रेक्षकांच्या मनावर बिंबवण्यासाठी यादव यांनी आकड्यांचे खेळ करत त्यात गुंगवण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त निवडून आलेल्या जागांची संख्या बघू नका, तर निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेली मतांची टक्केवारी बघा असे आवाहन यादव करतात. भाजपा आणि काँग्रेसला मिळालेल्या जागांमध्ये लक्षणीय अंतर असले, तरी त्यांना मिळालेल्या मतांमध्ये असे अंतर नाही, हे पटवताना तिन्ही राज्यांमधली मतांची टक्केवारी ते सांगतात. ती सांगून झाल्यावर या चारही राज्यांत भाजपाला आणि काँग्रेसला मिळालेल्या मतांची बेरीज करून ती समोर ठेवतात. हरलेल्या काँग्रेसला भाजपापेक्षा साडेनऊ लाख मते जास्त मिळाली आहेत, हे त्यांना या द्राविडी प्राणायामातून सुचवायचे आहे. या करामतीमुळे कदाचित काँग्रेसचे सांत्वन होईल, पण ज्या मतदाराने भाजपाच्या हाती सत्ता दिली आहे, तो फसणार नाही. आपल्या या मुद्द्याकडे प्रेक्षकांनी दुर्लक्ष केले, तर निवडणूक निकालांच्या इतिहासाकडे लक्ष द्या, असे ते सुचवतात. विधानसभा मिळाली की लोकसभाही जिंकता येते अशी काही काळ्या दगडावरची रेघ नाही याला इतिहास साक्षी आहे, असे सांगत त्याच्या समर्थनासाठी सोयीची जंत्री सादर करतात.
 
 
ही तीन राज्ये जिंकणे भाजपाची गरज होती, ती राज्ये इंडिया आघाडीसाठी महत्त्वाची नव्हतीच, असेही यादव म्हणतात. मग जे मुळातच महत्त्वाचे नव्हते, ते हातातून निसटल्याचा इतका शोक करायची यादव यांना गरज का वाटली असावी? हा प्रश्न त्यांचे विश्लेषण ऐकताना पडतो. एक लोकसभा मतदारसंघ हा आठ विधानसभा मतदारसंघांनी मिळून बनतो, या सूत्राच्या आधारे ते या चारही राज्यांतल्या लोकसभेच्या 82 जागांवर काँग्रेस आधीपेक्षा चांगली कामगिरी करेल हे खात्रीने सांगतात. शिवाय हे फक्त आम्हीच सांगू, बाकी कोणी सांगणार नाही अशीही फुशारकी मारायलाही ते विसरत नाहीत. त्यांनी कागदावर केलेली ही आकडेमोड प्रत्यक्षात यायला पक्षाला, त्याच्या कार्यकर्त्यांना कंबर कसून मेहनत करावी लागेल, याविषयी ते चकार शब्दही काढत नाहीत.
 
 
ज्या राज्यांत बिगर भाजपा सरकारे आहेत, अशा राज्यातल्या मतदारांनीही लोकसभेसाठी भाजपाला पसंती दिली आहे, हा अगदी गेल्या लोकसभा निवडणुकीचाही इतिहास आहे. उदाहरणार्थ - मागच्या लोकसभा निवडणुकीत, राजस्थानात काँग्रेसचे सरकार होते, तरी लोकसभेच्या जागा भाजपाला मिळाल्या आहेत. ओडिशात बिजू जनता दलाला विधानसभेत अधिक जागा मिळाल्या, तरी लोकसभेत भाजपाला अधिक जागा मिळतात. तेलंगणातही गेल्या विधानसभेत एक जागा असताना लोकसभेत भाजपाला चार जागा मिळाल्या होत्या. दिल्ली विधानसभा आपच्या ताब्यात असली, तरी तिथले खासदार भाजपाचे आहेत. लोकसभेसाठी मिळणारा मतदारांचा कौल हा केंद्र सरकार करत असलेल्या कामाचे फलित आहे. विधानसभा निवडणुकीत मतदान करताना लावल्या जाणार्‍या निकषांपेक्षा वेगळे आणि जास्त निकष लोकसभा निवडणुकीत मतदार लावत असतो. यादव यांना हे खरेच समजत नसेल काय? तेव्हा काँग्रेसने अशा कुडमुड्या निवडणूक विश्लेषकापासून चार हात लांब राहावे. योगेंद्र यादवांच्या या आकडेमोडीच्या चक्रव्यूहात अडकण्यापेक्षा, विरोधकांना जबाबदारीने वागण्याचा जो मोदींनी सल्ला दिला आहे, तो मनावर घ्यावा. काही फायदा झाला, तर त्यानेच होईल.