सुरक्षित सुटकेचा ‘कावेरी’ प्रवाह

विवेक मराठी    05-May-2023   
Total Views |

operation kaveri sudan
दोन लष्करशहांमधील सत्तासंघर्षामुळे खनिजसंपत्तीने समृद्ध असणार्‍या सुदानमध्ये प्रचंड हिंसाचार माजला आहे. यामध्ये आतापर्यंत 400हून अधिक जणांचा बळी गेला आहे. सुदानमध्ये 4000 भारतीय असून या हिंसाचारामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या नागरिकांनी पंतप्रधानांना आवाहन केल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन कावेरी’ नावाची मोहीम हाती घेतली. परंतु सुदानची राजधानी खार्तुम हेच या लष्कराचे केंद्र बनल्याने तेथील विमानतळावरून सुटका करणे जोखमीचे होते. त्यामुळे भारताने प्रवासी जहाज पाठवण्याचा निर्णय घेतला. सौदी अरेबियाच्या मदतीने ऑपरेशन कावेरी यशस्वीपणे सुरू आहे.
 
रशिया-युक्रेन युद्धसंघर्ष सव्वा वर्षानंतरही कायम असल्याने संपूर्ण जग चिंतेत असताना एका नव्या संघर्षाने जागतिक समुदायाचे लक्ष वेधून घेतले आहे. हा संघर्ष आहे आफ्रिकेतील सुदान देशामधला. सुदान हा भौगोलिकदृष्ट्या आफ्रिकेतील तिसर्‍या क्रमांकाचा मोठा देश असून या देशात गेल्या काही दिवसांपासून कमालीचा हिंसाचार माजला असून त्यात 400हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचाराची तीव्रता इतकी भयंकर आहे की तिथे रस्त्यावर मृतदेहांचा खच पडलेला आहे. यामुळे संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष सुदानकडे वळले आहे. साधारण वर्षभरापूर्वी जी परिस्थिती युक्रेनमध्ये उद्भवली होती किंवा त्यापूर्वी अफगाणिस्तानात जो हिंसाचार माजला होता, तशाच पद्धतीने सुदानमध्ये रक्तरंजित हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. या हिंसाचाराचे स्वरूप समजून घेण्यापूर्वी सुदानविषयी जाणून घ्यायला हवे.
 
 
सुदान हा भौगोलिकदृष्ट्या आफ्रिकेतील तिसर्‍या क्रमांकाचा मोठा देश आहे. दोन दशकांपूर्वी या देशाची दोन देशांमध्ये विभागणी झाली. एकाला दक्षिण सुदान म्हणतात आणि दुसर्‍या देशाला उर्वरित सुदान म्हणतात. ही विभागणी झाली नसती, तर हा देश आफ्रिकेतला सर्वांत मोठा देश राहिला असता. दक्षिण सुदान हा संयुक्त राष्ट्रसंघाचा 193वा सदस्य देश आहे. इस्लामीक प्रजासत्ताक असणार्‍या या देशात बहुसंख्य ख्रिश्चन लोकांचा समावेश आहे. सुदानची लोकसंख्या सुमारे 4 कोटींच्या आसपास असून दक्षिण सुदानची लोकसंख्या सव्वा कोटीच्या आसपास आहे. हा देश खनिज संपत्तीने समृद्ध देश आहे. प्रामुख्याने इथे सोन्याच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आहेत. इतिहासकाळात अनेक पाश्चिमात्य वसाहतवादी देश सोन्याच्या शोधासाठी सुदानमध्ये आले होते. येथे तेलाच्या खाणीही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे आफ्रिकेतील एक महत्त्वाचा देश म्हणून सुदान ओळखला जातो. पूर्वी हा देश पारतंत्र्यात होता. काही काळ तेथे इंग्लंडचे साम्राज्य होते, तर काही काळ तेथे इजिप्तची राजवट होती. 1950च्या दशकामध्ये सुदानला स्वातंत्र्य मिळाले. पण स्वातंत्र्य मिळूनही तेथे शांतता टिकलीच नाही. 1950च्या दशकात कमालीचा हिंसाचार झाला. याचे कारण तेथे आफ्रिकी आदिवासींच्या काही छोट्या टोळ्या आहेत. त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर रक्तपात आणि संघर्ष सुरू असतो. हा रक्तपात इतका भयंकर असतो की महिनोनमहिने तो थांबत नाही. या संघर्षांमध्ये लक्षावधी लोक मरण पावलेले आहेत. त्यामुळे तेथे लोकशाही खर्‍या अर्थाने नांदलीच नाही. ज्या ज्या वेळी तेथे लोकशाहीचे प्रयोग झाले, त्या वेळी लष्कर प्रभावी बनताना दिसून आले. सुदानमध्ये अंतर्गत वाद आहेतच, तसेच शेजारील देशांबरोबरही त्यांचे अनेक वाद आहेत. त्यामुळे या देशाकडे सैन्य मोठ्या संख्येने आहे. भारताची लोकसंख्या 142 कोटी असून आपल्याकडे 10 लाखांचे सैन्य आहे, पण सुदानची लोकसंख्या 4 कोटी असून त्यांच्याकडे 4.5 लाखांचे लष्कर आहे. कारण या देशाला सातत्याने अंतर्गत आणि बाह्य अस्थिरतेचा, हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे. दक्षिण सुदान फुटून बाहेर पडला, तशाच प्रकारे तेथील काही प्रदेशांमध्ये यादवी युद्ध रंगले आहे.
 
 

operation kaveri sudan
 
गेल्या तीन दशकांपासून सुदानमध्ये लष्करी हुकूमशहांचे साम्राज्य आहे. या लष्करी हुकूमशहांचा लोकशाही व्यवस्थेकडे सत्ता हस्तांतरित करण्याचा नकार असतो. त्यातून अनेक लष्करी बंड होतात, उठाव होतात आणि सत्ता आपल्या हाती घेतली जाते. सध्याच्या संघर्षाचे स्वरूप पाहिल्यास सुदानमध्ये एकीकडे लष्कर आहे, तसेच स्पेशल प्रोटेक्शन फोर्स नावाचे पॅरामिलिटरी सैन्यही आहे. सुदान हा प्रामुख्याने अरब देश आहे. साधारणत: 2003मध्ये सुदानच्या पश्चिमेकडील भागात असणार्‍या काही मूळ आफ्रिकी वंशाच्या अल्पसंख्याक लोकांनी सुदानपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांचे बंड किंवा उठाव मोडून काढण्यासाठी तत्कालीन लष्करी हुकूमशहाने आपल्या उपप्रमुखाला तेथे पाठवले. त्याने हे बंड शमवण्यासाठी एक फोर्स तयार केली. त्यालाच स्पेशल प्रोटेक्शन फोर्स म्हटले जाते. या फोर्सची संख्या वाढत वाढत एक लाखापर्यंत गेली. आता ती इतकी मोठी झाली आहे की ते एक नवे सत्ताकेंद्र बनले आहे. या स्पेशल प्रोटेक्शन फोर्सचा प्रमुख आणि सध्याचा लष्करप्रमुख यांच्यामध्ये सध्या संघर्ष सुरू आहे. थोडक्यात लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यात सध्या रणकंदन माजले आहे. सुदानचे लष्करप्रमुख जनरल अब्देल-फताह बुर्‍हान आणि आरएसएफचे प्रमुख जनरल मोहम्मद हमदान दागालो यांच्यातील सत्तासंघर्षामुळे सुदान आज होरपळून निघत आहे. बुर्‍हान यांनी स्पेशल प्रोटेक्शन फोर्सला मूळ सैन्यात समाविष्ट होण्याचे आवाहन केले. परंतु तसे झाल्यास दागालो यांचे अस्तित्व राहणार नाहीये. त्यामुळे या दोघांत संघर्ष पेटला आहे. हा संघर्ष सुदानची राजधानी खार्तुम येथे सुरू आहे. राजधानीतील या संघर्षात प्रचंड हिंसाचारामुळे तेथील परकीय देशांच्या दूतावासांना धोका निर्माण झाला आहे. परिणामी 15 एप्रिलनंतर अनेक देशांनी आपले दूतावास भराभर बंद करण्यास सुरुवात केली. सर्वांत प्रथम अमेरिकेने आपल्या दूतावासातील अधिकारी तेथून काढून घेतले. त्यानंतर सौदी अरेबियाने काढून घेतले. त्यामुळे भारतात ही मागणी मोठ्या प्रमाणावर होऊ लागली.
 
 
 
सुदानमध्ये साधारणत: 2800 भारतीय वास्तव्यास आहेत. याखेरीज मूळ भारतीय वंशाचे 1200 लोक तेथे अनेक वर्षांपासून राहात आहेत. या 4000 भारतीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या संघर्षामुळे ऐरणीवर आला. त्यामुळे आमची सुटका करण्यात यावी, असे या नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केले. त्यानंतर भारताने यासाठी ‘ऑपरेशन कावेरी’ नावाची मोहीम हाती घेतली आणि ही अत्यंत यशस्वीपणे काम करत आहे. भारत दोन्ही प्रकारे प्रयत्न करत आहे. एकीकडे आपल्या प्रचंड क्षमता असणार्‍या महाकाय सी-14 विमानांचा यासाठी वापर करण्यात येत आहे. परंतु खार्तुम हे राजधानीचे शहर संघर्षाचे केंद्र बनले आहे. अफगाणिस्तानातही अशाच प्रकारे काबूल हे राजधानीचे शहर संघर्षाचे केंद्र बनले होते. अशा स्थितीत आपल्या नागरिकांची सुटका करणे अधिक आव्हानात्मक आणि कठीण बनते. त्यामुळे भारताने तांबड्या समुद्रामध्ये असणार्‍या खार्तुमच्या बंदरामध्ये प्रवासी जहाज पाठवले आणि 500 जणांना सुरक्षितपणे सोडवून आणले आहे. ‘ऑपरेशन कावेरी’अंतर्गत आतापर्यंत जवळपास 3500 जणांची सुटका करण्यात आली आहे.
 
 

operation kaveri sudan
 
लष्कप्रमुख जनरल अब्देल-फताह बुर्‍हान आणि आरएसएफचे प्रमुख जनरल मोहम्मद हमदान दागालो यांच्यातील संघर्ष सुदान होरपळण्यास कारणीभूत ठरत आहे
 
ऑपरेशन कावेरी याला एक वेगळे महत्त्व आहे. कावेरी ही नदी कर्नाटक-तामिळनाडूमध्ये वाहते. या नदीला एक धार्मिक महत्त्व आहे. भारताने अलीकडील काळात केलेल्या ऑपरेशन्सचे वेगळेपण म्हणजे आपल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशांच्या नावाने ती राबवली गेली. उदाहरणच द्यायचे झाल्यास, मागील वर्षी युक्रेनमध्ये भारताने ‘ऑपरेशन गंगा’ राबवले होते. या मोहिमेअंतर्गत भारताने युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय सुखरूप मायदेशी आणले होते. त्यापूर्वी अफगाणिस्तानात राबवलेल्या रेस्क्यू ऑपरेशनला ‘ऑपरेशन दैवीशक्ती’ असे नाव दिले होते. तुर्कस्तानमध्ये राबवलेल्या ऑपरेशनला ‘ऑपरेशन दोस्त’ असे नाव दिले गेले. या नावांमधून भारताने आपल्या परंपरा, आपली कटिबद्धता जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. कावेरीचा विचार करता ही नदी कर्नाटक-तामिळनाडूतून वाहात बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तशाच पद्धतीने या भारतीयांना आपल्या मायदेशी आणून आपल्यामध्ये मिसळून घेतले जाईल, असाही एक संदेश यातून दिला गेला आहे. या संपूर्ण मोहिमेवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष असून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकरही याबाबत प्रमुख भूमिका बजावत आहेत. याखेरीज परराष्ट्र राज्यमंत्री एस. मुरलीधरन हे सौदी अरेबियामध्ये आहेत. कारण सुदान हा अरब देश असल्याने तेथे सौदी अरेबियाचा खूप मोठा प्रभाव आहे. त्यामुळे सौदीच्या मदतीने भारत आपल्या नागरिकांची सुटका करत आहे. सौदीने आपले विमानतळ खुले केल्यामुळे सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. भारताचे हे ऑपरेशन अत्यंत यशस्वीपणे सुरू आहे. 2015मध्ये युद्धकाळातही सौदी अरेबियाने भारताला अशाच प्रकारे मदत केली होती. सौदी आणि येमेन यांच्यातील युद्धामुळे अडकलेल्या 4500 भारतीयांसह 41 देशांच्या नागरिकांना भारताने सुरक्षित परत आणले होते.
 
 
मुळात सुदान हा देश नैसर्गिक खनिजसंपत्तीने समृद्ध असूनही या देशाला हिंसाचाराचा शाप लागला आहे. दर वेळी केवळ त्याचे स्वरूप बदलत जाते आणि त्यामध्ये निष्पाप नागरिकांचा नाहक बळी जातो. आताचा संघर्ष थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
 
 


operation kaveri sudan
 
भारताची नवी ओळख
 
 
अलीकडच्या काळात ‘आपत्तिकाळातील संकटमोचक’ अशी भारताची जागतिक प्रतिमा तयार झाली आहे. संकटात सापडलेल्यांना सोडवणारा देश म्हणून भारताने मिळवलेले प्रावीण्य उल्लेखनीय आहे. या रेस्क्यू ऑपरेशनसाठी नौदल, हवाई दल, भूदल, वैद्यकीय व्यवस्था, दूतावास, राजदूत, परराष्ट्र मंत्रालय या सर्वांमधील समन्वयातून भारताने हे प्रावीण्य विकसित केलेले आहे. यापूर्वी भारत हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या पीस ऑपरेशनमध्ये सहभागी होत होता आणि भारताच्या लष्कराने इतर देशांमध्ये अनेकदा महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. परंतु गेल्या दोन दशकांमध्ये असे प्रसंग उद्भवले, जेव्हा भारताला इतर देशांमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांची सुटका करण्याचे आव्हान उभे ठाकले. आज जवळपास पावणेतीन कोटी भारतीय 133 देशांमध्ये राहताहेत. याच लोकांकडून भारताला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळत आहे. त्यांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. जेव्हा नैसर्गिक आपत्ती किंवा अंतर्गत यादवी, बंडाळी, युद्धसंघर्ष उद्भवतो, तेव्हा आपल्या नागरिकांची सुरक्षा हा कळीचा विषय ठरतो. अशा वेळी केंद्र सरकारची संपूर्ण यंत्रणा कामाला लागताना दिसते. अशा मोहिमांसाठी मंत्रिस्तरावरील अधिकारी नेमला जातो. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली बैठका होतात. परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री आदींना विशेष जबाबदारी दिली जाते. त्यातून अत्यंत सुरेख आणि अचूक समन्वयातून या मोहिमा यशस्वी केल्या जातात. कावेरी हे त्याचे उदाहरण आहे. 1994मध्ये सोमालियामध्ये हुतू आणि तुत्सी या दोन जमातींमधला यादवी संघर्ष पुढे आला होता. त्या वेळी सोमालियामधून भारतीयांची सुटका करण्यातून या मोहिमांची सुरुवात झाली. त्यानंतर भारताने एकामागून एक अशी ऑपरेशन्स राबवली. विशेष म्हणजे या ऑपरेशनमधून भारत केवळ आपल्या नागरिकांची सुटका करत नाही, तर अन्य देशांच्या नागरिकांचीही सुटका करतो, हे युक्रेन युद्धाच्या वेळी दिसून आले. कोरोनाच्या काळातही हजारो भारतीयांना परदेशातून मायदेशी आणताना हजारो अन्य देशवासीयांनाही त्यांच्या-त्यांच्या देशांमध्ये पोहोचवले. त्यामुळे पूर्वीच्या काळी शांतीसैनिक म्हटले की भारताचे जसे नाव पुढे यायचे, तशाच पद्धतीने आपत्तीच्या किंवा संघर्षाच्या काळात अडकून पडलेल्या नागरिकांच्या बचावासाठीचा पर्याय म्हणून भारताचे नाव घेतले जाते. मोठे देश किंवा पाश्चिमात्य देश हे केवळ त्या क्षेत्रातील नागरिकांचाच विचार करतात. पण भारत तसे करत नाही, तसेच भारत अधिकारी आणि सामान्य नागरिक असाही भेद करत नाही, हे सुदानमध्ये स्पष्टपणे दिसून आले. जगभरात आज ऑपरेशन कावेरीची चर्चा होत असून ही भारताची एक नवी ओळख आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
 
 
लेखक परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक